अडचणीच्या काळातही सुरजेवाला आमच्यासोबत उभे राहिले...

काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल केले असून, अनेक ज्येष्ठांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. यात महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांचाही समावेश आहे.
Congress leader Mallikarjun Kharge welcomes Randeep Surjewalas appointment
Congress leader Mallikarjun Kharge welcomes Randeep Surjewalas appointment

बंगळूर : काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना कर्नाटकचे प्रभारी नेमण्यात आहे. याचबरोबर सुरजेवाला यांना पक्षाच्या कार्यकारी समितीचे पूर्णवेळ सदस्य नियुक्त करण्यात आले आहे. या फेरबदलात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांना सरचिटणीसपदासह महाराष्ट्राच्या प्रभारीपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. मात्र, खर्गे यांनी सुरजेवाला यांच्या निवडीचे स्वागत करीत ही निवड योग्य असल्याचे म्हटले आहे.  

काँग्रेसने संघटनात्मक बदल काल जाहीर केले. सोनिया गांधी या परदेश दौऱ्यावर आहेत. त्यामुळे पक्षाची अप्रत्यक्ष जबाबदारी राहुल गांधी यांच्यावर आली आहे. नव्या बदलांमध्ये संघटनेतील ज्येष्ठ नेते मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, लुईझिनो फालेरो, अंबिका सोनी यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. नवी कार्यकारिणी नियुक्त करतानाच नवे सरचिटणीसही नियुक्त करण्यात आले आहेत. 

याबाबत खर्गे यांनी म्हटले आहे की, सरचिटणीसपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, अशी विनंती मी पक्षाला आधीच केली होती. आता पक्ष नेतृत्वाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मी समाधानी आहे. मी त्यावेळी विरोधी पक्ष नेता होतो आणि माझ्यावर सरचिटणीसपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली होती. यातून मुक्त करण्याची मागणी मी पक्षाला केली होती. 

मी या सर्व बदलांचे स्वागत करतो. सुरजेवाला यांची निवड ही पक्षासाठी योग्य ठरेल. ते सर्वांना विश्वासात घेऊन काम करतील. सुरजेवाला हे कठीण काळात आमच्यासोबत उभे राहिले आहेत, खर्गे यांनी नमूद केले.   

काँग्रेस कार्यकारिणीमध्ये राजीव सातव, रजनी पाटील, मुकुल वासनिक, अविनाश पांडे या महाराष्ट्रातील नेत्यांना स्थान मिळाले आहे. मात्र, कार्यकारिणीत स्थान मिळण्याची चर्चा असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र नव्या फेररचनेतही संधी मिळू शकली नाही. काँग्रेस पक्षसंघटनेच्या निवडणुकांसाठी केंद्रीय निवडणूक यंत्रणा स्थापन करून त्याची जबाबदारी मधुसूदन मिस्त्री या राहुल गांधी यांच्या निकटवर्तीय नेत्याकडे दिली आहे. 

गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, खर्गे, मोतीलाल व्होरा यांना सरचिटणीस म्हणून दूर करण्यात आले आहे. मात्र, व्होरा वगळता अन्य तिघांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. आझाद, आनंद शर्मा व मुकुल वासनिक या असंतुष्ट 23 मधील नेत्यांना कार्यकारिणीत स्थान देणे महत्त्वपूर्ण आहे. पी. चिदंबरम आणि राष्ट्रवादीमधून काँग्रेसमध्ये परतलेले तारिक अन्वर यांना प्रथमच कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. दिग्विजयसिंह, जयराम रमेश यांना कायम निमंत्रित म्हणून ठेवण्यात आले आहे. मोतीलाल व्होरा यांच्याकडे असलेली सरचिटणीस कार्यालय प्रशासनाची जबाबदारी पवनकुमार बन्सल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

अखिल भारतीय काँग्रेसचे पुढील अधिवेशन होईपर्यंत सोनिया गांधी यांनी दैनंदिन कामकाजात मदत करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यात ए. के. अँटनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला यांचा समावेश करण्यात आला आहे. 

काही राज्यांचे प्रभारीही बदलण्यात आले असून, त्यात महाराष्ट्राची जबाबदारी खर्गे यांच्याऐवजी एच. के. पाटील यांच्याकडे देण्यात आली. हरियानाच्या जबाबदारीतून गुलाम नबी आझाद यांना मुक्त करण्यात आले असून, विवेक बन्सल यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. मुकुल वासनिक यांच्याऐवजी तारिक अन्वर यांच्याकडे केरळ व लक्षद्वीप, रणदीप सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटक, रजनी पाटील यांच्याकडे जम्मू-काश्‍मीर तर राजीव शुक्‍ला यांच्याकडे हिमाचल प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com