गोळीबार अन् बूथ कॅप्चरींग झाले तरीही निवडणूक आयोग म्हणतो फेरमतदान नाहीच!

मध्य प्रदेशात मिनी विधानसभा ठरणार पोटनिवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी विरुद्ध काँग्रेस असा सामना आहे.
congress leader kamal nath targets election commission over madhya pradesh byelection
congress leader kamal nath targets election commission over madhya pradesh byelection

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांत सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. राज्यात 28 विधानसभा मतदारंसघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका झाल्या. काही ठिकाणीगोळीबार झाला तर काही ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने मात्र, फेरमतदान घेण्यास नकार दिला आहे. यावरुन काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी निवडणूक आयोगाला लक्ष्य केले आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात 3 नोव्हेंबरला पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. 

या पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली होती. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला होता.  

पोटनिवडणुकांच्या मतदानावेळी काही मतदान केंद्रावर गोळीबार झाला तर काही मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशा एकूण 17 मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी केली. याआधी दिग्विजयसिंह यांनी ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करणारे ट्विट केले होते. यावरुनही मोठा गदारोळ सुरू आहे. 

निवडणूक आयोगाने फेरमतदान घेण्यास नकार दिला आहे. याविषयी बोलताना कमलनाथ म्हणाले की, पोटनिवडणुकांत सुमावली, मुरैना आणि मेहगांव येथे अतिशय वाईट घटना घडल्या. काही ठिकाणी गोळीबार झाला तर काही ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेण्यात आली. याचे सर्व पुरावे समोर असतानाही निवडणूक आयोगाने फेरमतदान घेतले नाही. याबद्दल मला दु:ख वाटते. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com