मतदान पूर्ण होण्याआधीच दिग्विजयसिंह म्हणाले, फेरमतदान घ्या...

मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुका झाल्या. या निवडणुकांत सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असलेला काँग्रेस आमनेसामने आले आहेत.
congress leader digvijay singh demands fresh voting in madhya pradesh
congress leader digvijay singh demands fresh voting in madhya pradesh

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकांत सत्ताधारी भाजप विरुद्ध काँग्रेस असा जोरदार सामना रंगला आहे. राज्यात आज 28 विधानसभा मतदारंसघात पोटनिवडणुका झाल्या. काही ठिकाणी काँग्रेसच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रावरुन हटवण्यात आले तर काही ठिकाणी मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. मतदानावेळी असे गैरप्रकार झाल्याने फेरमतदान घेण्याची मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केली आहे. 

मध्य प्रदेशात 28 विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुका झाल्या. या पोटनिवडणुकांचा निकाल 10 नोव्हेंबरला लागणार आहे. जोतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत 22 आमदार काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडले होते. आज राज्यात एकूण 28 मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. 

या पोटनिवडणुकांमुळे मध्य प्रदेशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसचे सरकार पाडणाऱ्या भाजपला धडा शिकवण्यासाठी काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी कंबर कसली होती. राज्यातील भाजप नेत्यांना फोडून मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्नही कमलनाथ यांनी या निवडणुकीत केला होता.  

आज झालेल्या मतदानावेळी काही मतदान केंद्रावर काँग्रेसच्या प्रतिनिधींना बाहेर काढण्यात आले. काही मतदान केंद्रे ताब्यात घेण्याचे प्रकारही समोर आले आहेत. अशा एकूण 17 मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्याची मागणी दिग्विजयसिंह यांनी केली. याआधी दिग्विजयसिंह यांनी ईव्हीएमबाबत प्रश्न उपस्थित करणारे ट्विट केले होते. यावरुनही मोठा गदारोळ सुरू आहे. 

दिग्विजयसिंह म्हणाले की, गृहमंत्र्यांचे भाचेजावई रविंद्र शर्मा हे बरौनी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक आहे. शर्मा हे आपल्यासोबत दुसऱ्या एका गाडीत उघडपणे गुंड लोकांना घेऊन फिरत होते. ते मतदारांना जबरदस्तीने मतदान करायला लावत होते. याची तक्रार आम्ही निवडणूक आयोगाला केली आहे. 

राज्यातील सत्ता कायम राखण्यासाठी भाजपला केवळ 9 जागा हव्या आहेत. काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी पोटनिवडणुकीतील सगळ्या जागा जिंकाव्या लागतील. यानंतर राजकीय समीकरणे बदलू शकतात. कमलनाथ यांच्यावर आता मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. कारण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या 22 आमदारांना पराभूत करुन सत्त्तांतराचा वचपा त्यांना काढावा लागणार आहे. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com