सुशांत मृत्यू प्रकरणात नवीन ट्विस्ट; लवकरच उलगडणार गूढ?

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूचे गूढ कायम आहे. आता वर्षभरानंतर या प्रकरणातील गूढ उलगडण्याची शक्यता आहे.
complaint filed in national human right commission in sushant singh rajput case
complaint filed in national human right commission in sushant singh rajput case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तपासाची सुरवात केली आणि नंतर सीबीआयसह सक्त वसुली संचालनालय (ED), अमली पदार्थ विरोधी विभागाने (NCB) या उडी घेतली. आता या प्रकरणात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे (NHRC) धाव घेण्यात आली आहे. यामुळे लवकरच या प्रकरणातील गूढ उलगडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.  

सुशांतच्या मृत्यूला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. अद्याप सुशांतच्या मृत्यूचे गूढ उलगडलेले नाही. आता मुंबई विद्यापीठातील एका विद्यार्थ्याने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे धाव घेतली आहे. आयोगाने या प्रकरणाची दखल घेऊन निष्पक्षपाती तपास व्हावा, यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. आधीच तीन केंद्रीय यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात असताना आता मानवाधिकार आयोगाला यात ओढण्यात आले आहे. मानवाधिकार आयोगाने यात लक्ष घातल्यास या प्रकरणाचे कोडे लवकर उलगडेल, अशी शक्यताही व्यक्त होत आहे. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. या प्रकरणात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या  पथकाने सुशांतचा फ्लॅट आणि इमारतीच्या छताची काही काळ तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. 

सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला होता. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला होता. सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला आहे. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली होती. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

मात्र, सीबीआयने या प्रकरणी खुलासा करीत तपास सुरू असल्याचे म्हटले होते. सीबीआयने म्हटले होते की, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे. सर्व पैलू काळजीपूर्वक तपासून पाहण्याचे काम सुरू आहे. सीबीआयने याबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. आता सुशांतच्या मृत्यूला एक वर्ष झाले असून, अद्याप सीबीआयने तपासातील कोणतीही प्रगती जाहीर केलेली नाही अथवा त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हेसुद्धा सांगितलेले नाही. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com