राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत, सहकार्य आणि आशीर्वाद गरजेचा, म्हणून दिल्लीत आलो...

Eknath Shinde | Devendra Fadnavis : आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार
Eknath Shinde | Devendra Fadnavis
Eknath Shinde | Devendra FadnavisSarkarnama

मुंबई : राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. शपथविधीनंतरचा दोघांचाही हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात काल संध्याकाळी त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तर आज सकाळी त्यांनी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. ते आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

या भेटीगाठींदरम्यान दोघांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेवून या दिल्ली दौऱ्यामागील उद्देश स्पष्ट केला. मुख्यमंत्री एकनथ शिंदे म्हणाले, या पत्रकार परिषदेमागे असा कोणताही राजकीय उद्देश नव्हता. पण राज्याच्या विकासासाठी केंद्राची मदत, सहकार्य आणि आशीर्वाद गरजेचा, म्हणून शपथ घेतल्यानंतर दिल्लीत आलो. ज्या राज्याला केंद्राची मदत मिळते ते राज्य वेगाने प्रगती करते, असेही शिंदे म्हणाले.

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?

याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ही भेट सदिच्छा भेट आहे. आम्ही दोघेही उद्या आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देऊ. पण अधिवेशनापूर्वी हा विस्तार होईल. अधिवेशन हे पुढे ढकलले जाणार का यावर बोलतांना शिंदे म्हणाले, १८ तारखेला राष्ट्रपतीपदाची निवडणूक असल्याने अधिवेशन मागे-पुढे होऊ शकते.

आमदार पैशाने विकले गेले नाहीत :

बंडखोरी केलेले आमदार पैशाने विकले गेले असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात येत आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेना-भाजप युतीचं सरकार जे अडीच वर्षींपूर्वी झालं पाहीजे होतं ते आम्ही आता स्थापन केले आहे.

एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक देखील एकडे तिकडे जायला दहा वेळा विचार करतो, हे ५० आमदार तर तीन-चार लाख लोकांमधून निवडून आले आहेत. या आमदारांना मागच्या अडीच वर्षात अनुभव आला आहे. मुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. हे आमचं हे बंड नाही, ही गद्दारी म्हणतायत ही गद्दरी नाही, ही क्रांती आहे, अन्यायाविरोधातील उठाव आहे, हे पैशांने विकले जाणारे नाहीत.

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको :

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नको, सरकार देखील याच मताचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ओबीसींना न्याय देण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, आपण निवडणूक आयोगाशी संवाद साधून त्यांना विनंती करु, असा विश्वासही शिंदे यांनी दिला. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक ठिकाणी महापूर आहे, त्यामुळे निवडणुकीची यंत्रणा पोहचू शकत नाही. मनुष्यबळ मदतीच्या कामात असते अशा स्थितीमध्येही निवडणुका घेता येणे अवघड असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com