नवी दिल्ली : सीमेवरील संघर्षाला भारतच जबाबदार असून, एक इंचही भूमी भारताला देणार नाही, अशी आठमुठी भूमिका चीनने घेतली आहे. यावर भारतानेही चीनला खडे बोल सुनावले आहेत. चीनने ताबा रेषेचा आदर करावा आणि तेथील स्थितीमध्ये कुठल्याही प्रकारचा एकतर्फी बदल करू नये, असे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ठणकावून सांगितले.
राजनाथसिंह हे सध्या शांघाय सहकार्य परिषदेच्या संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीसाठी मॉस्कोला रवाना झाले असून, तेथेच त्यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही देशांमध्ये लडाख भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथसिंह आणि चीनचे संरक्षणमंत्री वेई फेंग यांच्यात शुक्रवारी प्रथमच चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दोन तासांहून अधिक काळ चर्चा झाली.
सीमेवरील कारवायांवरून राजनाथसिंह यांनी चीनला पुन्हा एकदा खडे बोल सुनावले. चीनने सीमेवरील स्थिती काळजीपूर्वक हाताळावी, अन्यथा ती आणखी बिघडेल अशी कोणतीही पावले टाकू नयेत, असा इशारा त्यांनी चीनच्या संरक्षणमंत्र्यांना दिला. भारत स्वतःचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता यांचे संरक्षण करण्यासाठी सक्षम असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सीमेवरील तणावासाठी चीनने भारताला जबाबदार धरले आहे. चीनने म्हटले आहे की, भारत -चीन सीमेवर सध्या निर्माण झालेल्या तणावामागील सत्य स्पष्ट आहे. याची संपूर्ण जबाबदारी भारतावर आहे. चीन आपली एक इंचही भूमी गमावणार नाही. आमची संरक्षणे दले यासाठी पूर्णपणे तयार आहे. देशाची सार्वभौमता सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. भारताने चर्चेने हा प्रश्न सोडवायला हवा. सीमेवरील लष्कर मागे घेण्याच्या मुद्द्यावर आम्ही भारताशी चर्चा करुन लवकरात लवकर कार्यवाही करण्यास तयार आहोत.
दरम्यान, अरुणाचल प्रदेशातील पाच तरुणांचे चीनच्या लष्कराने अपहरण केले असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार निनाँग एरिंग यांनी आज केला. याआधी काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती त्यामुळे चीनला आता उत्तर द्यायला हवे, अशी मागणी एरिंग यांनी केली आहे. या तरुणांच्या नातेवाइकांनीही याला दुजोरा दिल्यानंतर अरुणाचल पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे.
याचवेळी चिनी नागरिकांना भारतीय लष्कराने मदत केल्याचा प्रकार समोर आला आहे. उत्तर सिक्कीममध्ये रस्ता चुकलेल्या तीन चिनी नागरिकांना भारतीय लष्कराने मदत केली. त्यांना खाद्यपदार्थ आणि वैद्यकीय मदत देऊन त्यांना योग्यस्थळी नेऊन सोडले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.