
Amaravati Political News : माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेनंतर आंध्र प्रदेशातील राजकारणाला कलाटणी मिळाली आहे. नायडू यांना अटक केल्यानंतर त्यांच्या विरोधातील वातावरणाचा फायदा एनडीए आघाडीला होईल, असा अंदाज होता. मात्र, चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेमुळे आंध्र प्रदेशचे वातावरण तापले असतानाच आता त्यांच्या अटकेविरोधात आंध्र प्रदेशातील राजकीय पक्ष एकत्र येत असून, त्यांना पाठिंबा वाढत असल्याने जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सरकार व भाजपसमोरील अडचणीत भर पडली आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या अटकेमुळे आंध्रातील सर्वच विरोधी पक्षांनी जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. येथील अभिनेत्यापासून राजनेता झालेल्या पवन कल्याण यांनी त्यांच्या जनसेना पक्षाचा पाठिंबा टीडीपीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनडीए आघाडीच्या अडचणीत भर पडली आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता पवन कल्याण एनडीएच्या बैठकीत सहभागी झाले होते. त्यांनी आघाडीतील पक्षासॊबत चर्चाही केली होती. मात्र, आता त्यांनी हा निर्णय बदलला असून, भाजपच्या विरोधातील भूमिका घेत चंद्राबाबू नायडू यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीचा नायडू यांना तोटा होण्याऐवजी फायदा होत असल्याने आंध्र प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.
विजयवाडा न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, ते सध्या राजमुंद्री मध्यवर्ती कारागृहात आहेत, तर त्यांच्या अटकेच्या निषेधार्थ टीडीपीचे कार्यकर्ते गेल्या सहा दिवसांपासून आंध्र प्रदेशात निदर्शने करत आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या सून नारा ब्राह्मणी यांनी सत्ताधारी वायएसआरसीपी राज्य करण्यास असमर्थ असल्याची टीकाही केली आहे.
दरम्यान, चंद्राबाबू नायडू हे कौशल्य विकास योजना घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे आंध्र प्रदेश गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) प्रमुख एन. संजय यांनी दावा केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री नायडू यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल 371 कोटींचा घोटाळा केल्याचा दावाही एन. संजय यांनी केला आहे. एका कंपनीचे नाव फिक्स करून हे पैसे देण्यात आले. आंध्र प्रदेश सरकारने स्वत: निर्णय घेतला आणि सिमेन्सला पैसे दिले. (National News)
इतकेच नव्हे, तर '371 कोटी रुपयांपैकी 241 कोटी रुपये इतर खासगी कंपन्यांना दिल्याचाही दावा ईडीने केला आहे. चंद्राबाबू नायडू यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून घोटाळा केला. हेही सीबीआय आणि ईडीच्या तपासातही सिद्ध झाले आहे. 9 कंपनीचे मुख्यालय जर्मनीत असल्यामुळे ते काहीही करू शकत नाहीत, पण त्यातून अनेकांना लाभ झाला. चंद्राबाबू नायडू हे या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत.
Edited By- Anuradha Dhawade
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.