सुशांत मृत्यू प्रकरणात सीबीआयनं अखेर तोंड उघडलं..तपासाबाबत केला मोठा खुलासा

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचे गूढ सहा महिन्यानंतरही कायम आहे. याप्रकरणी सीबीआयने अखेर मौन सोडले आहे.
cbi clarifies about probe of actor sushant singh rajput death case
cbi clarifies about probe of actor sushant singh rajput death case

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) अद्याप तपासाची प्रगती जाहीर केलेली नाही. सुमारे सहा महिन्यांनतरही सुशांतच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. या प्रकरणी भाजपचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे धाव घेतली होती. यामुळे पंतप्रधान कार्यालयाने निर्देश दिल्यानंतर अखेर सीबीआयने तपासाबाबत तोंड उघडले आहे. 

सीबीआयने सुशांतच्या मृत्यूचा तपास अहवाल जाहीर करावा, अशी मागणी स्वामी यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला केली होती. पंतप्रधान कार्यालयाने हे पत्र सीबीआयकडे पुढे पाठवले होते. यावर सीबीआयने स्वामींना उत्तर दिले आहे. एवढे दिवस सीबीआयने या प्रकरणी बाळगलेले मौन सोडून अखेर तोंड उघडले आहे. 

सीबीआयने म्हटले आहे की, सीबीआय अतिशय व्यावसायिक पद्धतीने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन तपास करीत आहे. सर्व पैलूंचा बारकाईने अभ्यास करुन तपास सुरू आहे. तपासात अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक उपकरणांसह नवीन सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येत आहे. या प्रकरणाशी निगडित मोबाईल टॉवर डेटाचा अभ्यासही करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तींची लोकेशन जाणून घेण्यासाठीही याचा उपयोग झाला आहे. 

सीबीआयच्या पथकाने तपासासाठी अलिगड, फरिदाबाद, हैदराबाद, मुंबई, मानेसर आणि पाटणा येथे भेट देऊन तपास केला आहे. दिल्लीतील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ञांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आङे. अनेक तज्ञांचे अहवाल सीबीआय तपासत आहे, असे सीबीआयने नमूद केले आहे. मात्र, सीबीआयने सुशांतच्या मृत्यू नेमका कशामुळे झाला याबद्दल भाष्य केलेले नाही. 

सीबीआयने दोन वेळा सुशांतच्या मृत्यूच्या वेळचा घटनाक्रम त्याच्या फ्लॅटमध्ये तयार करुन पुन्हा तपासला होता. त्यानंतर सीबीआयच्या पथकासमवेत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) तीन न्यायवैद्यक तज्ञांनी मुंबईतील सुशांतच्या घराची तपासणी केली होती. या पथकाने सुशांतच्या मृत्यूची वेळ शवविच्छेदन अहवालात नसल्याबद्दल प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. सीबीआयकडे 'एम्स'च्या पथकाने अहवाल सादर केला होता. मुंबई पोलिसांनी दिलेला सुशांतचा शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपासणी करुन 'एम्स'च्या पथकाने हा अहवाल तयार केला होता. 

सीबीआयने या अहवालाचा अभ्यास केला आहे. या प्रकरणातील इतर पुराव्यांच्या आधारे सीबीआय अंतिम निष्कर्षापर्यंत पोचणार आहे. 'एम्स'च्या अहवालात सुशांतवर विषप्रयोग झाला नसल्याची बाबही नमूद करण्यात आली होती. यामुळे सुशांतने आत्महत्या केली असून, त्याची हत्या झाली नसल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला आहे, अशी चर्चा सुरू होती. 

सुशांत हा 14 जूनला मृतावस्थेत आढळला होता आणि साडेतीन महिन्यांनंतरही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम होते. या प्रकरणी सुरूवातीला मुंबई पोलीस तपास करीत होते. मुंबई पोलिसांनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, अभिनेत्री कंगना राणावत, भाजपचे खासदार सुब्रह्मण्याम स्वामी आणि राज्यातील भाजप नेत्यांनी सुशांतची हत्या झाल्याचा दावा केला होता. यात नंतर बिहार सरकारनेही उडी घेतली होती. बिहारमध्ये एफआयआर दाखल करुन तेथील पोलीस पथक तपासासाठी मुंबईत दाखल झाले होते. हा तपास सीबीआयकडे सोपवावा यासाठी विरोधी पक्ष भाजपने आणि बिहार सरकारने आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com