सरकारची कार्यशैली अन् विरोधकांचे वर्तन लोकशाहीसाठी लज्जास्पद!

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. विरोधकांनी संसदेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे.
bsp supremo mayawati slams union government and opposition over agriculture bills
bsp supremo mayawati slams union government and opposition over agriculture bills

नवी दिल्ली : कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी सरकार आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. विरोधकांनी याच मुद्द्यावर राज्यसभा आणि लोकसभेतील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. आता भाजप सरकारने यावर कडी करत राज्यसभा अनिश्चित काळासाठी तहकूब केली आहे. सरकारने यासाठी संसदेतील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराचे कारण दिले असले तरी विरोधकांच्या बहिष्काराचे अस्त्र निकामी करणे हा यामागील खरा उद्देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सरकार आणि विरोधकांना एकाचवेळी लक्ष्य केले आहे. 

संसद अधिवेशनाच्या सुरुवातीपासून कोरोनाचे सावट कायम आहेत. यासाठी सर्व मंत्री आणि खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यात अनेक खासदार पॉझिटिव्ह आढळले होते. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हजेरी लावणारे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे नंतर पॉझिटिव्ह आढळले होते. तरीही सरकारने अधिवेशनाचे कामकाज सुरूच ठेवले होते. 

आता कृषी विधेयकांवरुन सर्वच विरोधी पक्ष सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. याचबरोबर भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील शिरोमणी अकाली दल या मुद्द्यावर सरकारमधून बाहेर पडले आहे. याचवेळी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचे बिजू जनता दलही सरकारच्या विरोधात गेले आहे. घटक पक्षांची वाढती नाराजी आणि एकवटणारे विरोधक या पार्श्वभूमीवर सरकारची कोंडी झाली आहे. सरकारने राज्यसभेचे कामकाज तहकूब करुन या विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब झाल्याने विरोधकांच्या आंदोलनाची धारही कमी होईल, असा सरकारचा कयास आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

मायावती यांनी आधी कृषी विधेयकांना विरोध करण्याची भूमिकी घेतली होती. त्या म्हणाल्या होत्या की, संसदेत शेतकऱ्यांशी निगडित दोन विधेयके कोणत्याही शंका दूर न करता संमत करण्यात आली. याबाबत बहुजन समाज पक्ष हा सरकारशी अजिबात सहमत नाही. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना काय वाटते याकडे सरकारने लक्ष द्यावे. यातून शेतकऱ्यांचे भले होऊ शकेल. 

या मुद्द्यावर मायावती यांनी आता सरकारसोबत विरोधी पक्षांनाही लक्ष्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, संसद हे लोकशाहीचे मंदिर मानले जाते. याच्या सर्व मर्यादा तोडून टाकण्यात आल्या आहेत. सरकारची कार्यशैली आणि विरोधकांचे वर्तन हे संसदेची मर्यदा, संविधानाची प्रतिष्ठा व लोकशाहीला लज्जा आणणारे होते. हे अतिशय दु:खद आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com