मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई मुंबई उच्च न्यायालयाने अवैध ठरवली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे महापालिकेबरोबरच हा शिवसेनेलाही मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. या प्रकरणी मुंबई महापालिकेची तातडीची बैठक महापौर किशोरी पेडणेकर घेत आहेत.
कंगनाच्या बंगल्यावरील कारवाईबाबत उच्च न्यायालयाने निर्णय देताना महापालिकेच्या कृतीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. ही कारवाई गैरहेतूने केल्याचा शेरा न्यायालयाने मारला आहे. या कारवाईबद्दल कंगनाला नुकसानभरपाई मिळेल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयावर कंगनाने आनंद व्यक्त केला आहे. तिने म्हटले आहे की, एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि जिंकते, त्यावेळी तो विजय हा त्या व्यक्तीचा नसून लोकशाहीचा असतो. मला धैर्य देणाऱ्या सर्वांचा आभार. याचबरोबर माझ्या भंगलेल्या स्वप्नांना हसणाऱ्यांचेही धन्यवाद. तुम्ही व्हिलन झाला म्हणूनच मी हिरो होऊ शकले.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मुंबई महापालिकेला धक्का बसला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयावर चर्चा करुन पुढील कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या विधी विभागाची बैठक महापौर किशोरी पेडणेकर घेत आहेत. याविषयी पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही जे केले ते महापालिका नियमांनुसार होते. मी अद्याप उच्च न्यायालयाचा आदेश पाहिलेला नाही. मी तो पाहिल्यानंतर त्यावर बोलू शकेन.
कंगना राणावतच्या वादग्रस्त वक्तव्यांची दखल उच्च न्यायालयानेही घेतली. सरकारबद्दल मत व्यक्त करताना काही मर्यादा पाळाव्यात, असे उच्च न्यायालयाने कंगनाला सुनावले. यामुळे वादग्रस्त वक्तव्ये करणाऱ्या कंगनाला एक प्रकारची ताकीद मिळाली आहे. उच्च न्यायालयानेच स्वत:हून दखल घेतल्याने यापुढे कंगनाला वक्तव्ये करताना काळजी घ्यावी लागणार आहे. दरम्यान, नुकतीच उच्च न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधातील देशद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला होता.
कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात रोज जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशला तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती.
अभिनेत्री कंगना राणावत हिच्या वांद्र्यातील पाली हिल येथील बंगल्यातील बेकायदा बांधकामाबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावून बंगला सील केला होता. यातील बांधकामाबाबत कागदपत्रे सादर करण्यास महापालिकेने कंगनाला दिलेली २४ तासांची मुदत ९ सप्टेंबरला संपल्यानंतर महापालिकेच्या पथकाने कंगनाच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकाम पाडून टाकले होते.
Edited By Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.