भाजपमध्ये जाऊन चूक झाली, आम्हाला परत घ्या! घरवापसीसाठी पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

पश्चिम बंगालमधील पराभवानंतर भाजपला गळती लागली आहे. भाजप नेते आणि पदाधिकारी तृणमूल काँग्रेसमध्ये परतू लागले आहेत.
bjp wokers stage protest in front of tmc office for entry in tmc
bjp wokers stage protest in front of tmc office for entry in tmc

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील (West Bengal) पराभवानंतर राज्यातील भाजपला (BJP) गळती लागली आहे. बीरभूम येथील तृणमूल काँग्रेसच्या (TMC) 50 पदाधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता घरवापसीसाठी त्यांनी तृणमूलच्या कार्यालायसमोर चक्क धरणे धरले. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळून ते पुन्हा पक्षात आले आहेत. 

विधानसभा निवडणुकीआधी तृणमूलचे अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवानंतर हे नेते आणि पदाधिकारी तृणमूलमध्ये परतू लागले आहेत. बीरभूम जिल्ह्यातील भाजपच्या 50 पदाधिकाऱ्यांनी आज तृणमूलच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरू केल्याचे अनोखे चित्र आज दिसले. या पदाधिकाऱ्यांच्या हातात फलक होते. आमची चूक झाली, आम्हाला पक्षात परत घ्या, असे या फलकांवर लिहिले होते. 

हे पदाधिकारी मागील काही दिवसांपासून तृणमूलमध्ये परत येण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु, त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी धरणे आंदोलनाचा मार्ग पत्करला. अखेर त्यांच्या या आंदोलनाला यश आले आणि त्यांचा पक्षात प्रवेश झाला. विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश करून चूक केल्याची कबुली त्यांनी दिली. यापुढे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली राज्याच्या विकासासाठी काम करु, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तृणमूलमध्ये परतणारे नेते आणि पदाधिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

नुकतेच भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व खासदार मुकुल रॉय हे तृणमूलमध्ये परतले आहेत. मागील काही आठवड्यांपासून रॉय यांच्या घरवापसीची चर्चा होती. भाजपचे पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी नुकतीच पक्षाची बैठक कोलकत्यात बोलावली होती. या बैठकीला रॉय यांनी दांडी मारली. रॉय यांनी ममतांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. नंतर ममता आणि त्यांचे भाचे व तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय आणि त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांचा पक्षप्रवेश झाला होता. 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसची साथ सोडून भाजपमज्ये प्रवेश करणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये मुकुल रॉय यांचा समावेश होता. भाजपचा पराभव झाल्यानंतर तृणमूलमधून आलेले अनेक नेते उघडपणे घरवापसीबद्दल बोलू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रॉय हे पुन्हा तृणमूलमध्ये परतणार अशी चर्चा सुरू झाली होती. भाजपमध्ये ते बाजूला फेकले गेले असून, ते नाराज असल्याचेही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांचे पुत्र शुभ्रांशू यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे ही चर्चा सुरू झाली होती.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com