पाटणा : इंडिगो कंपनीचे विमानतळ व्यवस्थापक रुपेशकुमारसिंह यांच्या हत्येने बिहारमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री निवासापासून थोड्याच अंतरावर झालेल्या या हत्येने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. दरम्यान, या प्रकरणावरुन भाजपने नितीशकुमार यांच्यावर निशाणा साधला असून, त्यांची कोंडी करण्याचा डाव टाकला आहे.
सिंह यांच्या नातेवाईकांनी या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) तपास करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. पाटणा विमानतळावरून मंगळवारी (ता. १२) कामावरून घरी परतताना सिंह यांची हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्या अपार्टमेंटसमोरच त्यांच्यावर सात गोळ्या झाडल्या होत्या. मुख्यमंत्री, राज्यपाल आदींचे निवासस्थान तेथून अवघ्या दोन किलोमीटरवर अंतरावर आहे.
सिंह यांच्यावर बिहारमधील सारणपूर जिल्ह्यातील जलालपूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सिंह हे अनेक बडे राजकारणी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांच्या हत्येवरुन राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे.
या हत्येवरुन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विरोधी पक्षांसोबत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपकडूनही उपस्थित केला जात आहे. भाजप नेते व राज्यसभेचे खासदार गोपालनारायणसिंह यांनी म्हटले आहे की, नितीशकुमार यांचे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आहे. बिहारमधील सरकार आमच्या पाठिंब्यावर चालत असले तरी आम्हाला राज्यातील परिस्थितीची जाण आहे. बिहारमधील या स्थितीबद्दल बोलणे अतिशय गरजेचे आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, भ्रष्टाचारात वाढ झाली आहे. सध्याच्या पोलीस व्यवस्थेवर आमच्या सरकारची कोणतीही पकड नाही.
भाजपचे खासदार विवेक ठाकूर यांनी या प्रकरणी सीबीआय तपासाची मागणी केली आहे. हा अतिशय गंभीर गुन्हा असून, त्याची तातडीने दखल घ्यायला हवी. पोलिसांनी पुढील काही दिवसांत तपास पूर्ण करावा अथवा तपास सीबीआयच्या हवाली करावा.
मागील काही काळापासून भाजपने नितीशकुमार यांच्याकडे असलेले गृह खाते काढून घेण्यासाठी दबावतंत्र सुरू केले आहे. अरुणाचल प्रदेशमधील आमदार भाजपने फोडल्याने जेडीयूमध्ये तीव्र नाराजी आहे. असे असतानाही भाजपकडून कुरघोडीचे राजकारण सुरूच आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडे गृह, सामान्य प्रशासन, दक्षता आणि सर्वसाधारण प्रशासन या खात्यांचा कार्यभार आहे. भाजपने गृह खाते मागण्यास सुरवात केली असून, यासाठी दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.