पाटणा : बिहारमध्ये (Bihar) मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त जनता दल (JDU) आणि भाजपचे (BJP) सरकार सत्तेवर आहे. मात्र, भाजपच्या आमदारानेच मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकावले होते. आता या आमदाराला नितीशकुमारांवर टीका करणे महागात पडले आहे. भाजपने त्याच्यावर कारवाईचा दंडुका उगारला आहे. त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
आमदार टुन्ना पांडे यांच्या विधानांचा भाजपने गंभीर दखल घेतली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने पांडे यांना या प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांना दहा दिवसांच्या आत यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. तुमच्यावर कारवाई का करु नये, अशी विचारणाही त्यांना करण्यात आली आहे. आता त्यांना तातडीने पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. भाजपमधील अनेक नेत्यांनाही पांडे यांच्यावर कारवाईची मागणी पक्षाकडे केली होती.
मागील काही काळापासून भाजपचे नेते नितीशकुमार यांना सातत्याने लक्ष्य करीत आहेत. याला जेडीयूचे नेतेही उत्तर देऊ लागल्याने सत्ताधारी आघाडीत जुंपल्याचे चित्र अनेक वेळा दिसू लागले आहेत. यातच आता भाजपचे आमदार टुन्ना पांडे यांनी नितीशकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले होते की, नितीशकुमार हे केवळ परिस्थितीमुळे बनलेले मुख्यमंत्री असून, ते माझे नेते नाहीत. माजी खासदार शहाबुद्दीन यांना खरे बोलण्याची शिक्षा मिळाली होती. महाआघाडीचा माझा काही संबंध नाही. मी केवळ भाजपचा नेता आहे.
बिहारमधील जनतेने तेजस्वी यादव यांना निवडून दिले होते. परंतु, नितीशकुमार यांनी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करुन सत्ता मिळवली, असा टोलाही पांडे यांनी लगावला आहे. पांडे हे विधान परिषद सदस्य आहेत तर त्यांचे बंधू बच्चा पांडे हे राष्ट्रीय जनता दलाचे आमदार आहेत. अनेक वेळा ते नितीशकुमार यांच्यावर टीका करीत आहेत. दारु गैरव्यवहार प्रकरणात नितीशकुमार तुरुंगात जातील, असे भाकितही त्यांनी वर्तवले आहे.
कमी जागा येऊनही मुख्यमंत्रिपदी नितीशकुमार
बिहारच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दल 75 जागा मिळवून सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. दुसऱ्या क्रमांकावर 74 जागांसह भाजप होता. जेडीयूला 43 जागा मिळाल्या होत्या आणि काँग्रेसला 19 जागा मिळाल्या होत्या. नितीश यांच्या जेडीयूला कमी जागा मिळाल्याने ते पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा सुरू झाली होती. अखेर भाजपने नितीशकुमार यांचेच नाव पुढे केले होते. आता मात्र, भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत.
अरुणाचलमध्ये भाजपकडून आधी विश्वासघात
अरूणाचलमध्ये जेडीयूचे सात आमदार होते. यातीस सहा आमदारांनी जेडीयूला सोडचिठ्ठी देऊन भाजपशी घरोबा केला होता. अरुणाचलमधील 60 सदस्यसंख्या असलेल्या विधानसभेत जेडीयूचा केवळ एक आमदार उरला आहे. यामुळे पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलचा एक आमदार पकडून भाजपचे संख्याबळ आता 48 वर गेले.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.