अखेर संबित पात्रांना 'गुड न्यूज' मिळाली..!

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरुन गदारोळ सुरू आहे. त्यांनी आता थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांना अखेर दिलासा मिळाला आहे.
bjp spokesperson sambit patra says finally good news came
bjp spokesperson sambit patra says finally good news came

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेच्या मुद्द्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. गोस्वामी हे सध्या तळोजा तुरुंगात आहेत. गोस्वामी यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यावर गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला आहे. गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजप नेते आक्रमक झाले होते. आता या निकालाबद्दल भाजपचे नेते आनंद व्यक्त करु लागले आहेत.  

गोस्वामी यांना वरळीतील निवासस्थानातून 4 नोव्हेंबरला अटक करुन अलिबाग जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने गोस्वामी यांची रवानगी 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत केली होती. न्यायालयीन कोठडीमुळे गोस्वामी यांना सध्या त्यांना तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. 

गोस्वामी यांनी अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबरला गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर निर्णय दिला. उच्च न्यायालयाने गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. दरम्यान, गोस्वामी यांनी अलिबाग सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर अलिबाग न्यायालयाला चार दिवसांत निर्णय देण्याचेही उच्च न्यायालयाने निर्देश दिले होते. 

आता याप्रकरणी गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतरीम जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत गोस्वामी यांची तातडीने सुटका होईल हे पाहण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात गोस्वामींच्या बाजून हरीश साळवे यांनी तर महाराष्ट्र सरकारच्या बाजूने कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. 

गोस्वामी यांच्या अटकेवरुन भाजप नेते आक्रमक झाले होते. भाजपच्या केंद्रापासून राज्यातील नेत्यांनी या प्रकरणी महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केले होते. महाराष्ट्रात आणीबाणी लादली गेल्याची टीकाही भाजप नेते करीत होते. भाजपचे आमदार राम कदम यांनी गोस्वामी यांच्यावरील कारवाईवरुन उपोषण केले होते. तसेच, राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन गोस्वामींना न्याय देण्याची मागणी केली होती. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करणारे ट्विट भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा केले आहे. 'आख़िर आज अच्छी खबर आ ही गयी,' असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी ट्विटमध्ये गोस्वामींच्या नावाचा उल्लेख केला नसला तरी जामीन मंजूर झाला, असे म्हटले आहे. 

इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांची आई कुमुद नाईक यांच्या २०१८ मध्ये झालेल्या मृत्युप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (ता.4) महाराष्ट्र पोलिसांनी अटक केली होती. इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक व त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक हे दोघे २०१८ मध्ये अलिबाग येथे मृतावस्थेत सापडले होते. या दोघांनीही आत्महत्या केली होती. 

पोलिसांना त्यावेळी अन्वय यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. अर्णब गोस्वामी व अन्य दोघांनी आपणास व्यवहाराचे ५ कोटी ४० लाख रुपये न दिल्याने आपण आर्थिक अडचणीत आलो असून, त्यामुळे आत्महत्या करावी लागत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले होते. त्यावेळी पोलिसांनी अर्णब यांच्या विरोधात अन्वय व त्यांच्या आईला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला होता. ही फाईल नंतर बंद करण्यात आली. आता पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com