bjp shifted mlas from rajasthan to gujarat due horse trading
bjp shifted mlas from rajasthan to gujarat due horse trading

घोडेबाजाराच्या भीतीने भाजपने आमदार हलवले गुजरातमध्ये

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा अधिवेशन होत असून, राजकीय हालचालींनाही वेग आला आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याविरोधात सचिन पायलट यांनी बंड पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलावले आहे. यामुळे राज्यातील राजकीय हालचाली पुन्हा वेगवान झाल्या आहेत. गेहलोत यांच्या भीतीने भाजपने सहा आमदार गुजरातमध्ये हलवले असून, आणखी आमदार गुजरातमध्ये पाठवले जाणार आहेत. गेहलोत हे कोणत्याही स्थितीत राज्यातील सत्ता सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता भाजपनेही सावध पवित्रा घेतला आहे.

विधानसभा अधिवेशन १४ ऑगस्टपासून बोलावण्यास राज्यपालांनी मान्यता दिली आहे. याचबरोबर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अधिवेशनादरम्यान सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. आता विधानसभा अधिवेशन होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. गेहलोत सरकारसाठी हे अधिवेशन कसोटीचे तर पायलट यांच्यासाठी अस्तित्वाचे ठरणार आहे. यामुळे गेहलोत हे फार खबरदारी घेत आहेत. त्यांनी आधी काँग्रेस आमदारांना जयपूरमधील हॉटेल फेअरमाँटमध्ये ठेवले होते. आता या आमदारांना जैसलमेरमधील सूर्यगड हॉटेलमध्ये हलविण्यात आले आहे. 

भाजपचे सहा आमदार गुजरातमधील पोरबंदर येथे पोचले आहेत. पोरबंदर विमानतळावर यातील आमदार निर्मल कुमावत बोलताना म्हणाले की, राजस्थानमध्ये अनेक राजकीय हालचाली घडत आहेत. मुख्यमंत्री गेहलोत यांच्याकडे बहुमत नाही. बहुमत मिळवण्यासाठी ते भाजप आमदाराचा छळ करीत आहेत. या परिस्थितीत आम्ही सहा आमदार सोमनाथाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. पुढील दोन दिवस आम्ही येथेच राहणार आहोत. 

विधानसभेतील बहुमत चाचणीवेळी काँग्रेसलाच मत द्यावे, यासाठी आमच्यावर राजस्थान सरकार दबाव आणत आहे. आणखी काही आमदार लवकरच आमच्यासोबत येत आहेत. ते लवकरच येथे पोचतील, असे कुमावत यांनी सांगितले. यामुळे राजस्थानमधील आमदार आता राज्य सरकारच्या त्रासाला कंटाळून गुजरातमध्ये आश्रय घेत असल्याचे चित्र आहे. गेहलोत यांच्याकडून घोडेबाजार होण्याच्या भीतीने भाजपने आमदारांनाच गुजरातमध्ये हलवण्याचा अखेर निर्णय घेतला आहे.  

राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे, असा आरोप गेहलोत वारंवार करीत आहेत. या प्रकरणी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही पत्र लिहिले होते. तसेच, पंतप्रधान मोदींशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन राज्यातील परिस्थिती त्यांच्या कानावर घातली होती. गेहलोत हे कोणत्याही स्थितीत राज्यातील सत्ता सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे. यामुळे आता भाजपनेही सावध पवित्रा घेतला आहे.

पायलट हे राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री होते. त्यांनी मुख्यमंत्री गेहलोत यांच्याविरोधात बंड केल्याने काँग्रेसने त्यांची प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्रिपदावरुन 14 जुलैला उचलबांगडी केली होती. याचबरोबर विधानसभा अध्यक्षांनी पायलट आणि इतर १८ आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. उच्च न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती दिली आहे. याला विधानसभा अध्यक्ष सी.पी.जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता याला काँग्रेसचे मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com