भाजपमध्ये सवर्णांना डावललं जातंय; आमदाराचाच पक्षाला घरचा आहेर

सत्ताधारी भाजप आणि जेडीयूच्या सरकारचा बहुप्रतिक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. यावरुनही आता गदारोळ सुरू झाला आहे.
bjp mla gyanendra singh gyanu targets patry after bihar cabinet expansion
bjp mla gyanendra singh gyanu targets patry after bihar cabinet expansion

पाटणा : बिहारमधील भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात नव्याने 17 मंत्र्यांचा समावेश झाला आहे. मात्र, यावरुन भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपचे आमदार ज्ञानेंद्रसिंह ज्ञानू यांनी यांनी आपल्याच पक्षाला घरचा आहेर देत अनेक गंभीर आरोप केले आहेत. 

राज्यपाल फागू चौहान यांनी आज 17 नवीन मंत्र्यांना शपथ दिली. यात भाजपचे 9 आणि जेडीयूचे 8 मंत्री आहेत. यात भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहनवाज हुसेन, प्रमोद कुमार, आलोक रंजन झा, नितीन नवीन, नारायण प्रसाद, नीरजसिंह बबलू, सुभाषसिंह, सम्राट चौधरी, जनक राम यांचा समावेश आहे. जेडीयूच्या मंत्र्यांमध्ये श्रवणकुमार, संजय झा, लेसी सिंह, सुनीलकुमार, जयंत राज, मदन साहनी, सुमितसिंह, जमा खान यांचा समावेश आहे. राज्यातील मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या आता 30 वर गेली असली तरी अद्याप सहा जागा रिकाम्या आहेत. 

नव्या मंत्र्यांमधील प्रथमच मंत्रिमंडळात समावेश झालेले भाजपचे मंत्री अधिक आहेत. भाजपने अधिक नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून, जेडीयूने मात्र, मागील वेळी मंत्रिमंडळात असलेल्यांना प्राधान्य दिले आहे.  नितीश सरकारचा शपथविधी मागील 16 नोव्हेंबरला झाला होता त्यावेळी मुख्यमंत्र्यासोबत 14 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. मात्र, नंतर मेवालाल चौधरी यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  

मंत्रिमंडळ विस्तारावरुन आमदार ज्ञानेंद्रसिंह ज्ञानू यांनी सरकार तसेच, स्वपक्षावरच हल्ला चढवला आहे. त्यांनी म्हटले आहे की, मंत्रिमंडळात सवर्णांना स्थान देण्यात आले नाही. अनुभवशून्य व्यक्तीला उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहेत. अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देताना जुन्याजाणत्या नेत्यांना डावलण्यात आले. माझे नाव मंत्र्यांच्या यादीत नाही याचे मला दु:ख नाही. मात्र, दक्षिण बिहारमधील एकही मंत्री नाही. 

भाजपने जात, विभाग आणि प्रतिमा यांचा विचार केला नसून, सवर्णांना डावलण्यात आले आहे. भाजपला फक्त सवर्णांची मते हवी आहेत. माझ्यासोबत 12 आमदार सध्या आहेत. वेळ आल्यावर मी याबाबत योग्य तो निर्णय घेईन, असा इशाराही ज्ञानेंद्रसिंह ज्ञानू यांनी दिला आहे.  

अनेक दिवसांपासून राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू होती. मात्र, याला भाजपकडून विलंब लावला जात होता. विस्तारासाठी भाजपकडून नावे दिली जात नसल्याचे खुद्द नितीशकुमारांनी उघड केले होते. यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद दूर झाले नसल्याचे समोर आले होते. नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधीही मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा कालावधी लागलेला नव्हता. नितीशकुमारांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, याआधी कधीही मला मंत्रिमंडळ विस्तारास एवढा वेळ लागला नव्हता. आम्ही सुरवातीलाच मंत्रिमंडळ विस्तार करीत होतो. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com