आमदारांना चहा पाजणाऱ्या नेत्याला मोदींनी पुन्हा बनवलं मुख्यमंत्री

सत्ताधारी भाजपने बहुमताचा आकडा गाठला होता पण मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला होता.
Narendra Modi and N.Biren Singh
Narendra Modi and N.Biren SinghSarkarnama

इम्फाळ : मणिपूर विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) सत्ताधारी भाजपने स्वबळावर बहुमताच्या आकडा गाठला आहे. पुन्हा सत्ता मिळाल्यानंतर राज्यात मुख्यमंत्रिपदाचा पेच निर्माण झाला होता. यातच मुख्यमंत्री बिरेनसिंह यांनी आमदारांना चहापानाला बोलावून शक्तिप्रदर्शन केल्याचा प्रकार समोर आला होता. याची दखल घेत भाजप नेतृत्वाने त्यांना तातडीने दिल्लीला पाचारण केले होते. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिंह यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली आहे.

मुख्यमंत्रिपदाचे दावेदार बिरेनसिंह आणि थोंगाम विश्वजित यांच्यासह भाजपच्या (BJP) प्रदेशाध्यक्षा शारदा देवी हे तिघे काल (ता.15) दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले सिंह आणि विश्वजित हे दोघेही त्यांच्या मतदारसंघात मोठ्या मतांनी विजयी झालेले आहेत. सिंह यांनी भाजपच्या विजयी आमदारांसाठी चहापानाचे आयोजन केले होते. भाजपच्या 32 आमदारांपैकी 25 आमदार या चहापानाला उपस्थित होते, असा दावा सिंह यांच्या गोटातून करण्यात आला होता. याचवेळी विरोधी गटाने भाजपचे केवळ एक तृतीयांश आमदार चहापानाला उपस्थित असल्याचा दावा केला होता.

या चहापान कार्यक्रमामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. हे एकप्रकारे सिंह यांचे शक्तिप्रदर्शन असल्याचा संदेश विरोधकांनी पक्ष नेतृत्वाला पोचवला होता. या चहापान कार्यक्रमामुळे भाजपमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. शक्तिप्रदर्शनातून सिंह यांनी नेतृत्वाला संदेश दिल्याचे मानले जात होते. या सर्व घडामोडींमुळे भाजपमधील काही नेत्यांनी खासगीत नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने सिंह यांच्यासह मुख्यमंत्रिपदाचे दुसरे दावेदार विश्वजित यांना दिल्लीत बोलावले होते. आज त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी चर्चा केली. यानंतर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची धुरा बिरेनसिंह सांभाळतील, असा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Narendra Modi and N.Biren Singh
विरोधकांना मोठा धक्का! विधानसभेतून आणखी 11 आमदार झाले निलंबित

चहापानामुळे पक्ष नेतृत्व सिंह यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात होते. याचा फटका त्यांना बसू शकतो, अशीही शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांना याचा फायदाच झाल्याचे दिसत आहे. सिंह यांच्यामागे मोठ्या संख्येने आमदार असल्याने नेतृत्वाने त्यांना डावलण्याचा निर्णय घेतला नाही. भाजपने मणिपूरसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांना निरीक्षक नेमले आहे. पण मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याने अखेर केंद्रीय नेतृत्वानेच सूत्रे हाती घेतली होती. अखेर मोदी, शहा आणि नड्डा यांनीच मणिपूरचा पुढचा मुख्यमंत्री ठरवला आहे.

Narendra Modi and N.Biren Singh
मोदींनी दोन्ही दावेदार दिल्लीत बोलावले अन् माळ जुन्याच मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात घातली

मुख्यमंत्री एन.बिरेनसिंह (N.Biren Singh) यांनी राज्यपालांना भेटून त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. ते काळजीवाहू म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. बिरेनसिंह यांनी मणिपूरमध्ये (Manipur Election) पक्षाला पुन्हा सत्तेत आणल्याने त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे, असे पक्षातील काही नेत्यांचे म्हणणे होते. याचवेळी असे केल्यास पक्षाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांना डावलले जाईल, असे पक्षातीलच आणखी एक गट म्हणत होता. भाजपच्या प्रदेशाध्यक्षा शारदा देवी यांना मुख्यमंत्रिपदाचा वादावर काहीही स्पष्ट बोलणे टाळून संसदीय मंडळाकडे बोट दाखवले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com