शेतकऱ्यांच्या बांधावर जा..भाजपने खासदारांना लावले कामाला!

कृषी विधेयकांवरुन देशभरात वातावरण पेटले आहे. या विधेयकांवरुन विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. भाजपने हा विरोध मोडून काढण्यासाठी सगळ्या खासदारांना कामाला लावले आहे.
bjp has decided to reach out to the farmers on issue of agriculture bill
bjp has decided to reach out to the farmers on issue of agriculture bill

नवी दिल्ली : देशभरात कृषी विधयेकांवरुन वातावरण तापले आहे. ही बहुचर्चित दोन कृषी विधेयके आज राज्यसभेत विरोधकांनी घातलेल्या अभूतपूर्व गोंधळातच आवाजी मतदानाने मंजूर झाली. या विधेयकांवरुन सरकार विरुद्ध विरोधक असा वाद पेटला आहे. या विधेयकांवरुन विरोधक आक्रमक झाले असताना हा विरोध मोडून काढण्यासाठी भाजपने प्रत्येक खासदाराला कामाला लावले आहे. 

कृषि उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक 2020, शेतकऱ्यांना मूल्य आश्वासन (सुरक्षा) करार  व कृषि सेवा विधेयक 2020 ही विधेयके लोकसभेत मंजूर झाली होती. आज त्यावर राज्यसभेची मोहोर उमटली. या वेळी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत गोंधळ केला. सभापतींसमोरील हौद्यात जाऊन सदस्यांनी विधेयकाविरोधात घोषणा दिल्या. अखेर या गोंधळातच आवाजी मतदानाने ही विधेयके मंजूर करुन घेण्यात सरकारला यश आले. राज्यसभेचे कामकाज उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.  

या विधेयकांना मंजुरी मिळाली असली तरी त्यावरुन उठलेला गदारोळ कायम आहे. राज्यसभेचे उपसभापती हरिवंशसिंह यांनी आजच्या कामकाजात पक्षपातीपणा केला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. उपसभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव विरोधकांनी दाखल केला आहे. यामुळे हा विधेयकांवरुन सुरू झालेला वाद आणखी पेटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 

कृषी विधेयकांना होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या खासदारांची बैठक झाली. या बैठकीत सर्व खासदारांनी शेतकऱ्यांपर्यंत पोचून या विधेयकांचे फायदे समजावून सांगावेत, असे निर्देश देण्यात आले. या विधेयकाविरोधात नकारात्मक मत झाले असून, ते सकारात्मक व्हावे यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. या विधेयकांमुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार असून, त्यांच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोचवा, असे सांगण्यात आले आहे. 

या विधेयकांवरुन नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतली होती. या विधेयकांसाठी ते स्वत: मैदानात उतरुन विरोधकांवर हल्लाबोल करीत होते. कृषी विधेयकांना विरोध होत असला तरी ती संसदेत मंजूर करण्यावर पंतप्रधान  मोदी ठाम होते. हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी 12 तासाच्या आत मंजूर केल्याने मोदी सरकार या मुद्द्यावर अकाली दलासह इतर कोणत्या विरोधाला जुमानणार नाही हे अधोरेखित झाले होते. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com