हैदराबाद : हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीचा प्रचारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने महापालिका निवडणुकीत पूर्ण जोर लावला आहे. भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करण्यात येत असून, याला एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी उत्तर देत आहेत. त्यांच्यात आता जोरदार जुंपली आहे. आता हैदराबादी बिर्याणीऐवजी दुसऱ्याच बिर्याणीवरुन त्यांच्यात वाद सुरू झाला आहे.
हैदराबाद महापालिकेच्या प्रचाराला वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. महापालिकेसाठी येत्या १ डिसेंबरला मतदान होणार असून, ४ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. भाजपने नुकतीच डुब्बक विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीची एक जागा जिंकली आहे. भाजपचे उमेदवार रघुनंदन राव यांनी टीआरएसच्या सोलिपेटा सुजाता यांचा 1 हजार 470 मतांनी पराभव केला होता. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून, महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.
हैदराबादमधील ओल्ड सिटीत सर्जिकल स्ट्राईक करावा, असे विधान भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केले होते. याचा समाचार घेताना ओवेसी म्हणाले की, भाजपचे नेते नैराश्यग्रस्त झाले आहेत. त्यांना कोणतीच गोष्ट कळेनाशी झाली आहे. त्यांनी निश्चितपणे 'अहमुदिल्ला'मधील बिर्याणी (हे हॉटेल बीफ बिर्याणीसाठी प्रसिद्ध आहे) खावी.
यावर भाजप नेते संतप्त झाले आहेत. भाजपचे आमदार राजासिंह म्हणाले की, ओवेसी यांनी पोर्क बिर्याणी खावी. माझ्या परिसरात आज ही बिर्याणी वाटण्यात येत आहे. आमच्या परिसरातील वाल्मिकी समाज चांगली पोर्क बिर्याणी करतो. तुम्हाला बिर्याणी आवडत असेल तर तुम्हाला चवदार बिर्याणी मी देतो.
केंद्रीय मंत्री व भाजप नेत्या स्मृती इराणींना आज प्रचारसभेत तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) प्रमुख व मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर हल्लाबोल केला. सत्ताधारी टीआरएसला शहरात नुकत्याच आलेल्या महापुरासाठी जबाबदारी धरत 75 हजार अतिक्रमणे झालीच कशी, असा सवालही इराणींनी केला.
टीआरएस आणि एआयएमआयएमच्या भ्रष्ट युतीमुळे शहरात 75 हजार अतिक्रमणे होणे शक्य नाही, असे सांगून इराणी म्हणाल्या की, वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आता स्वप्नभंग झाला आहे. शहर संपूर्ण पुरात बुडाले आणि अनेक नागरिकांचा बळी गेला. याला टीआरएस आणि एआयएमआयएमची भ्रष्ट युती कारणीभूत आहे.
हैदराबादमधील ओल्ड सिटीत सर्जिकल स्ट्राईक करुन रोहिंग्या आणि पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात येईल, असे वादग्रस्त विधान भाजपचे तेलंगण प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार यांनी केले होते. यावर ओवेसींना आधी चीनवर सर्जिकल स्ट्राईक करा, असे प्रत्युत्तर दिले होते. याचा धागा पकडत इराणी म्हणाल्या की, भ्रष्टाचार करण्यासाठी तुम्हाला अशी कारवाई नको आहे.
हैदराबाद महापालिकेसाठी टीआरएसने सगळ्या 150 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. याचवेळी भाजप 149, काँग्रेस 146, तेलगू देसम पक्ष (टीडीपी) 106, एआयएमआयएम 51, डावे पक्ष 29 जागांवर निवडणूक लढत आहेत. मागील 2016 च्या निवडणुकीत टीआरएसने 99 जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. यावेळीही टीआरएसने सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.