एनआरसीची अंमलबजावणी करणार नाही अन् कोणी प्रयत्न केल्यास हाणून पाडू..!

बिहारमध्ये सत्ताधारी भाजप आणि जेडीयूमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. आता मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपला आव्हान दिले आहे.
bihar cm nitish kumar says nrc will be not implemented in bihar
bihar cm nitish kumar says nrc will be not implemented in bihar

पाटणा : बिहारमध्ये भाजप आणि संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) सरकार सत्तेवर आहे. जेडीयूचे संख्याबळ कमी असूनही, नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदी आहेत. मागील काळात दोन्ही पक्षांतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. आता नितीशकुमार यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी)  मुद्द्यावर थेट भाजपला आव्हान दिले आहे. 

एनआरसीच्या मुद्द्यावर केंद्रातील भाजप सरकार आग्रही आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची (सीएए) अंमलबजावणी करण्यासाठी एनआरसी आवश्यक आहे. सीएएचा उद्देश शेजारील मुस्लिमबहुल देशांतील अल्पसंख्याकांना भारताचे नागरिकत्व देणे हा आहे. याचवेळी एनआरसीचा उद्देश हा देशातील बेकायदा स्थलांतरितांची हकालपट्टी करणे हा आहे. या दोन्ही माध्यमातून भाजपकडून मुस्लिम विरोधाचे राजकारण केले जात असल्याचा दावा होत आहे. यामुळे या दोन्हींना विरोध होत आहे.  

जेडीयूच्या बैठकीत बोलताना नितीशकुमार यांनी या मुद्द्यावर भाजपला अप्रत्यक्षपणे आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, एनआरसीची अंमलबजावणी बिहारमध्ये केली जाणार नाही. असा प्रयत्न झाल्या तो आम्ही हाणून पाडू. 

विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या जागावाटपाच्या विलंबाबत बोलताना नितीशकुमार म्हणाले की, बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) जागावाटपाला अतिशय विलंब लागला. विधानसभा निवडणुकीआधी किमान पाच महिने जागावाटप व्हायला हवे होते. याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली. मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची माझी तयारी नव्हती. परंतु, भाजप आणि आमच्या पक्षाकडून आलेल्या दबावामुळे मी हे पद स्वीकारले. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह 15 मंत्र्यांनी 16 नोव्हेंबरला शपथ घेतली होती. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू आहे. मात्र, याला भाजपकडून विलंब लावला जात आहे. विस्तारासाठी भाजपकडून नावे दिली जात नसल्याचे खुद्द नितीशकुमारांनी उघड केले आहे. यामुळे दोन्ही पक्षांतील मतभेद दूर झाले नसल्याचे समोर आले आहे. 

नितीशकुमार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आतापर्यंतच्या कार्यकाळात कधीही मंत्रिमंडळ विस्ताराला एवढा कालावधी लागलेला नव्हता. नितीशकुमारांनीच याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, याआधी कधीही मला मंत्रिमंडळ विस्तारास एवढा वेळ लागला नव्हता. आम्ही सुरवातीलाच मंत्रिमंडळ विस्तार करीत होतो. 

नियमानुसार बिहारमध्ये 36 मंत्री होऊ शकतात. सध्या केवळ 14 मंत्री आहेत. मुख्यमंत्र्यांसह 15 मंत्र्यांनी 16 नोव्हेंबरला शपथ घेतनंतर लवकरच विस्तार होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावर बोलताना भाजपचे प्रदेश प्रवक्ते म्हणाले की, आम्ही लवकरच या मुद्द्यावर पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल चिंता व्यक्त केली असून, त्यांचे समाधान केले जाईल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com