वाद आवडे सर्वांना...नेत्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्ये करण्याची स्पर्धा

बिहारमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचाराचा जोर चढत असतानाच नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये करण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे.
bhupendra yadav says bihar will be again home for ultra leftist groups
bhupendra yadav says bihar will be again home for ultra leftist groups

पाटणा : बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोर चढला आहे. राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी बिहार दहशवाद्यांचा अड्डा बनेल, असे वादग्रस्त विधान करुन वाद ओढवून घेतला होता. आता भाजपचे प्रभारी भूपेंद्र यादव यांनी बिहार नक्षलवाद्यांचा अड्डा बनेल, असे विधान करुन नवा वाद निर्माण केला आहे. 

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.  

भूपेंद्र यादव यांनी आरजेडी सत्तेवर आल्यास बिहार नक्षलवाद्यांचा अड्डा बनेल, असे वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की, आरजेडीचे नेते तेजस्वी यादव हे कमकुवत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यास राज्यात नक्षलवाद्यांचा प्रभाव पुन्हा वाढेल. 

याआधी नित्यानंद राय यांचा वादग्रस्त व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वैशाली जिल्ह्यातील महनार येथील प्रचारसभेतील भाषणाचा हा व्हिडीओ होता. या सभेत बोलताना नित्यानंद राय म्हणाले होते की, बिहारमध्ये आरजेडीने सरकार बनवले तर बिहार दहशतवाद्यांचा अड्डा बनेल. काश्मीरमधून आम्ही ज्या दहशतवाद्यांना हाकलून लावत आहोत तेच बिहारमध्ये आश्रय घेतील. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे फ्रंटचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ओवेसी यांचा ऑल  इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com