आता भाजपमधूनच विरोधी सूर; प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं!

तुम्हाला पाहून लोक तोंड फिरवतील, असं आचरण करू नका, असा टोला त्यांनी लगावला आहे.
BJP
BJPsarkarnama

लखनऊ : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे घडलेल्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पण या घटनेवर भाजपमधील बहुतेक नेत्यांचे मौन आहे. केवळ खासदार वरूण गांधी यांनी उघडपणे यावर आपली भूमिका मांडली. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून डच्चू देण्यात आला. आता वरूण गांधींनंतर उत्तर प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनीही केंद्रीय मंत्र्यांना सुनावलं आहे. त्यामुळे भाजपमधूनही केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाविरोधात उघडपणे बोलण्यास सुरूवात झाल्याचे चित्र आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला रविवारी अटक झाली आहे. तो काल उत्तर प्रदेश पोलिसांसमोर (Uttar Pradesh Police) चौकशीसाठी हजर झाला होता. या घटनेचे दोन व्हिडीओ वरूण गांधी यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली होती. तसेच दोषींवर कडक कारवाईचीही मागणी केली होती. भाजपमधून केवळ त्यांनी आपली भूमिका उघडपणे मांडली होती. आता उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोरच कुणाचंही नाव न घेता टीकास्त्र सोडले आहे.

BJP
महाराष्ट्रासह देशावर ब्लॅकआऊटचे संकट; आता हे काम कराच!

स्वतंत्र देव म्हणाले, एक राजकीय नेता असणे म्हणजे तुम्ही कुणालाही फॉच्यूर्नरखाली चिरडू शकता, असं नाही. आपण राजकारणात लुटण्यासाठी किंवा कुणाच्या अंगावर फॉर्च्यूनर घालण्यासाठी आलो नाही. तुमच्या कृतीवरून तुम्हाला लोक मतदान करतात. तुम्ही ज्या भागात राहता, तिथे दहा लोक तुमची प्रशंसा करतील तेव्हा तुम्हाला अभिमान वाटेल. तुम्हाला पाहून लोक तोंड फिरवतील, असं आचरण करू नका, असं आवाहन स्वतंत्र देव यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. लखीमपूर घटनेनंतर भाजपविरोधात संतापाची लाट असल्याचे बोलले जात आहे. याची जाणीव आता नेत्यांनाही होऊ लागल्याने ते केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाच्या कृतीविरोधात उघडपणे बोलू लागल्याचे सांगितले जात आहे. यापुढील काळात भाजपमध्येही आणखी रोष वाढत जाईल, असे राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

BJP
आरोग्यमंत्री म्हणतात, आता महिलांना अविवाहित राहायला आवडतं!

दरम्यान, लखीमपूर खीरीतील गुन्हे शाखेच्या कार्यालयात आशिष हा शनिवारी चौकशीसाठी हजर झाला होता. कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असल्याने पोलिसांनी त्याला मागील दाराने आतमध्ये घेतले. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाने (एसआयटी) आशिष याची चौकशी केली. पोलीस उपमहानिरीक्षक उपेंद्र अगरवाल यांच्या नेतृत्वाखाली ही 9 सदस्यीय एसआयटीने ही चौकशी केली. त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. तसेच, काही प्रश्नांची उत्तरे देणे टाळले. त्यामुळे पोलिसांनी त्याला अखेर अटक केली, असे सूत्रांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com