नवी दिल्ली : बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे गिफ्ट दिले आहे. मोदींनी बांगलादेशला कोरोना लशीचे 12 लाख डोस भेट म्हणून दिले आहेत. याआधी मोदी सरकारने बांगलादेशला 20 लाख कोरोना लशींचे डोस भेट म्हणून दिले आहेत. आता बांगलादेशने दरमहा 50 लाख डोस मिळावेत, अशी मागणी केली आहे. मात्र, सरकारसमोर ही मागणी पूर्ण करण्याचे धर्मसंकट उभे राहिले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. मोदींचे बांगलादेशातील ढाक्यात आगमन झाल्याबरोबरच त्यांच्यासोबत 12 लाख कोरोना लशीचे डोस दाखल झाले. एअर इंडियाच्या विशेष विमानाने शंभर बॉक्समध्ये हे लशीचे डोस पाठवण्यात आले. याआधी भारताने बांगलादेशला 20 लाख कोरोना लशींची भेट दिली होती. हे डोस कोव्हिशिल्ड या लशीचे आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव देशात सुरु झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्यदिनाचा सुवर्णमहोत्सवी सोहळा आणि बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजिबूर रहमान यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात मोदी सहभागी होणार आहेत.
मोदींनी कोरोना लशीचे 12 लाख डोस देऊन बांगलादेशी नागरिकांची मने जिंकली आहेत. बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए.के.अब्दुल मोमेन यांनी मोदींचे जाहीर आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मोदींनी दिलेल्या कोरोना लशींच्या डोसचे आम्ही स्वागत करतो. सुरवातीला आम्ही भारताकडे 3 कोटी डोसची मागणी केली होती. ही मागणी भारताने मान्य केली आहे. भारताने आधी 20 लाख डोस आम्हाला भेट दिले होते. आता मोदींनी आणखी 12 लाख डोस भेट दिले आहेत. आम्ही आधी केलेल्या कराराचा आदर करण्याची हमी त्यांनी आम्हाला दिली आहे. आम्हाला दर महिन्याला अतिरिक्त 50 लाख डोस हवे आहेत.
मोदींनी बांगलादेशासोबत 'व्हॅक्सिन डिप्लोमसी' राबवली आहे. परंतु, बांगलादेशने आणखी डोसची मागणी केल्याने सरकारसमोरील अडचणीत वाढ होणार आहे. बांगलादेशला 3 कोटी डोस देण्याचा आधी दिलेला शब्द पाळण्यासोबत पुन्हा आणखी डोस पुरवल्यास सरकारसमोर मोठे संकट निर्माण होईल. कारण देशात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने कोरोना लशीच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. देशात संसर्गाचा वेग वाढू लागल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यात सर्वांत मोठी अडचण ही लशीच्या तुटवड्याची आहे. आता बांगलादेशने केलेल्या मागणीमुळे केंद्र सरकारसमोर धर्मसंकट निर्माण झाले आहे.
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा हा बांगलादेश होत आहे. यामुळे याला महत्व आहे. मागील काही काळापासून बांगलादेश घुसखोरांबाबत उच्चरवाने बोलणारे भाजप नेते शांत आहेत. बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा सध्या ते उपस्थित करताना दिसत नाहीत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मोदींची व्हॅक्सिन डिप्लोमसी अडचणीत आल्याचे मानले जात आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.