निवडणुकीच्या तोंडावर भाजपला अपशकुन? कायम विजयी बाजूला राहणाऱ्या सहकाऱ्याने सोडली साथ

मिनी लोकसभा ठरणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. यातील एका राज्यात भाजपला निवडणुकीआधीच मोठा झटका बसला आहे.
assam bjp ally bodoland peoples front joins congress before assembly elections
assam bjp ally bodoland peoples front joins congress before assembly elections

गुवाहाटी : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच भाजपच्या एका मित्रपक्षाने साथ सोडली आहे. एवढ्यावरच न थांबता या मित्रपक्षाने आता काँग्रेसचा हात धरला असून, आगामी निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरवेळी विजयी बाजूसोबत आघाडी करणाऱ्या सहकारी पक्षाने साथ सोडल्याने भाजपला या निवडणुकीत अपशकुन झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

निवडणूक आयोगाने तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम या चार राज्यांसह पुद्दुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या पाचपैकी सध्या केवळ आसामध्ये भाजपची सत्ता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत 2016 मध्ये भाजपला 60 जागा मिळाल्या होत्या, तर भाजप आघाडीने 86 जागा जिंकून बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. आसाम विधानसभेचे एकूण संख्याबळ 1126 आहे. 

मागील निवडणुकीवेळी भाजपसोबत बोडोलँड पीपल्स फ्रंट (बीपीएफ) आणि आसाम गण परिषद हे पक्ष होते. या पक्षांना अनुक्रमे 12 व 14 जागा मिळाल्या होत्या. यातील बीपीएफने भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बीपीएफचा मागील काळातील वाटचाल पाहिल्यास हा पक्ष कायम सत्तेत राहिला आहे. कारण या पक्षाने आघाडी केलेला पक्ष विजयी झाला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत बीपीएफने भाजपशी आघाडी केली होती. त्यात भाजपला विजय मिळून हा पक्ष सत्तेत आला. राज्यातील त्याआधीच्या दोन विधानसभा निवडणुकीत या पक्षाने काँग्रेसशी आघाडी केली होती. दोन्ही वेळा काँग्रेसला विजय मिळून हा पक्ष सत्तेत आला होता. 

आता कायम विजयी बाजूला असलेल्या पक्षाने साथ सोडल्याने भाजपसाठी आसाममधील सत्ता टिकवणे अवघड बनल्याची चर्चा आहे. राज्यातील हवा बदलली असून, सरकारविरोधी वातावरण हे बीपीएफने साथ सोडण्यामागे असल्याचे समोर येत आहे. पक्षाचे अध्यक्ष हागरामा मोहिलारी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ''शांती, एकता, आणि विकासाची कामे करण्यासाठी आगामी निवडणुकीत महाआघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आता यापुढे भाजपासोबत आघाडी किंवा मैत्री करणार नाही,'' असे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, आसामचे अर्थमंत्री आणि भाजपच्या नेतृत्वाखालील नॉर्थ ईस्ट डेमोक्रेटिक अलायन्स (एनईडीए)चे संयोजक डॉ. हेमंत बिस्वा सरमा यांनी यापूर्वीच बीपीएफबाबत संकेत दिले होते. आगामी निवडणूकीत भाजप बीपीएफसोबत आघाडी करण्यास इच्छुक नसल्याचे त्यांनी म्हटले होते. बोडोलँड क्षेत्रीय परिषदेचे (बीटीसी) मुख्य कार्यकारी सदस्य प्रमोद बोडो यांच्या नेतृत्वाखालील युनाटटेड पीपल्स पार्टी लिबरल (यूपीपीएल) सोबत आघाडी केल्याची घोषणाही भाजपने केली आहे. 

नुकत्याच झालेल्या बोडो क्षेत्रीय परिषदेच्या निवडणुकीत भाजपला 9 जागा मिळाल्या होत्या. तर भाजपची साथ सोडलेल्या बीपीएफचे 17 उमेदवार विजयी झाले होते. तर यूपीपीएलने 12 जागांवर विजय मिळवला होता. काँग्रेस व गण शक्ती पार्टीला प्रत्येकी 1 जागा मिळाली. त्यावेळी भाजपने बीपीएफची साथ सोडून यूपीपीएलशी आघाडी केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये मागील काही काळापासून धुसफूसही सुरू होती. 

आसामध्ये तीन टप्प्यांत मतदान...

निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आसामध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी पाचही राज्यांतील निकाल जाहीर केले जाणार आहेत. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com