एनडीए अन् महाआघाडीला तिसऱ्या आघाडीची टक्कर...ओवेसी, मायावती रिंगणात

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता एनडीए आणि महाआघाडी या दोन आघाड्यांच्या विरोधात तिसरी आघाडी रिंगणात उतरली आहे.
asduddin owaisi and mayawati formed third front in bihar assembly election
asduddin owaisi and mayawati formed third front in bihar assembly election

नवी दिल्ली :  सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधी पक्षांची महाआघाडी या दोन्ही आघाड्यांकडून राज्यातील जनतेचे कोणतेही कल्याण होणार नाही, असा हल्लाबोल एआयएमआयएमचे प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज केला. बिहारमध्ये तिसरी आघाडी स्थापन झाली असून, यात ओवेसी आणि मायावती यांचे पक्षही दाखल झाले आहेत.  

बिहार विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यांत होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीत सत्तारुढ संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीविरोधात (एनडीए) राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), काँग्रेस आणि डावे यांची महाआघाडी असे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

बिहारमधील विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि महाआघाडीला टक्कर देण्यासाठी ग्रँड डेमोक्रॅटिक सेक्युलर फ्रंट स्थापन करण्यात आला आहे. या तिसऱ्या आघाडीचे राष्ट्रीय लोक समता पक्षाचे उपेंद्र कुशवाह हे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत. यात ऑल  ओवेसी यांचा इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल मुसलमीन (एआयएमआयएम), मायावती यांचा बहुजन समाज पक्ष (बसप), सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, सामाजिक जनता दल (डेमोक्रॅटिक) आणि जनतांत्रिक पार्टी (सोशालिस्ट) समावेश आहे. 

येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना ओवेसी म्हणाले की, सत्ताधारी एनडीए आणि विरोधी महाघाडी या दोन्ही आघाड्यांनी बिहारमधील जनतेसाठी काहीच केलेले नाही. नवीन ग्रँड सेक्युलर डेमोक्रॅटिक फ्रंटचा घटक होताना मला अतिशय आनंद होत आहे. आम्ही जनतेसाठी कठोर परिश्रम करू. बिहारमधील जनतेने आम्हीला पाठिंबा द्यावा आणि राज्यातील राजकारणात तिसरा पर्याय म्हणून आम्हाला पुढे आणावे.

नितीशकुमार-भाजप यांची 15 वर्षे आणि आरजेडी-काँग्रेसच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात बिहारमधील गरीबांचा कोणताही फायदा झालेला नाही. राज्य सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक पातळीवर मागासलेले आहे. बिहारच्या भविष्यासाठी आम्ही आघाडी स्थापन केली असून, ती यशस्वी होण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आवाहनही त्यांनी केले. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. याचवेळी एनडीएमधून लोक जनशक्ती पक्ष (एलजेपी) बाहेर पडला आहे. चिराग पासवान यांनी राष्ट्रीय स्तर आणि लोकसभा निवडणुकीत भाजपसोबत राहण्याची भूमिका घेतली आहे. परंतु, बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पातळीवर जेडीयूसोबत वैचारिक मतभेद असल्याचे कारण देत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com