मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी जाहीर माफी मागावी अन्यथा...अर्णब गोस्वामींचा इशारा

बनावट टीआरपी प्रकरणी काही चॅनेल्स संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या प्रकरणात रिपब्लिक टीव्ही अडचणीत आली आहे.
arnab goswami demands public apology of mumbai police commissioner
arnab goswami demands public apology of mumbai police commissioner

मुंबई : मुंबई पोलिसांनी नुकतेच बनावट टीआरपी मिळवण्याबाबतचे रॅकेट उद्‌ध्वस्त केले. त्यात रिपब्लिक भारत, फक्त मराठी आणि बॉक्‍स सिनेमा या तीन चॅनेलचा समावेश होता. त्यांनी बनावट पद्धतीने टीआरपी मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अडचणीत आलेल्या रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. 

बनावट टीआरपी प्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्तीय अधिकारी (सीएफओ) शिवा सुब्रह्मण्यम सुंदरम यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. परंतु, सुंदरम यांनी चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता. यामुळे आज रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली. रिपब्लिक टीव्हीने या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. यामुळे सुंदरम यांनी पोलिसांनी चॅनेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करु नये, असे म्हटले आहे. 

सर्व वृत्तवाहिन्यांमध्ये रिपब्लिक टीव्हीने सर्वाधिक टीआरपी असल्याचा दावा केला आहे. बनावट टीआरपीबाबत मुंबई पोलिसांनी सुरू केलेल्या चौकशीबद्दल रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी म्हणाले की, अभिनेता सुशांतसिंह प्रकरणी आम्ही केलेल्या कव्हरेजमुळे आम्हाला लक्ष्य करण्यात येत आहे. सुशांत प्रकरणात आम्ही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता पोलीस मुद्दामहून ही कारवाई करीत आहेत. मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी या प्रकरणी आमची जाहीर माफी मागावी अन्यथा आम्ही त्यांना न्यायालयात खेचू. 

टीव्ही वाहिन्यांचा टीआरपी 'बीएआरसी' नावाची संस्था ठरवत असते. 'बीएआरसी'ने हे कंत्राट हंसा या संस्थेला दिले होते. मात्र, हंसा कंपनीतील कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या तीन वाहिन्यांनी हा गैरप्रकार केल्याचे उघड झाले. जून महिन्यात आरोपींचा यातील सहभाग निश्‍चित झाल्यानंतर दोन कर्मचाऱ्यांना हंसा कंपनीने काढून टाकले होते. या बनावट टीआरपी विरोधात हंसा कंपनीने गुन्हा नोंदवल्यानंतर दोन आरोपींना काल चौकशीसाठी बोलावले होते. या दोघांनी चौकशीत हे बनावट टीआरपीच्या रॅकेटची कबुली दिली. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या पथकाने दोघांना अटक केली होती. 

रिपब्लिक टीव्ही बरोबरच फक्त मराठी आणि बॉक्‍स ऑफिस हे दोन चॅनेल्ससुद्धा बनावट टीआरपी प्रकरणात अडचणीत आले आहेत. फक्त मराठी आणि बॉक्‍स ऑफिस चॅनेलच्या मालकांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, रिपब्लिक टीव्हीच्या व्यवस्थापनाची चौकशी करून पुढील कारवाई पोलीस करणार आहेत. मुंबईतील तब्बल 1800 घरामध्ये दर महिन्याला 400 ते 500 रुपये देऊन हे चॅनेल्स चालू ठेवावेत, असे सांगण्यात आले होते. टीआरपी वाढवण्यासाठी हा गैरप्रकार करण्यात आला. 

Edited by Sanjay Jadhav 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com