नवी दिल्ली : तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिला यांच्या निकटवर्ती व अण्णाद्रमुक पक्षाच्या नेत्या व्ही.के.शशिकला यांची 27 जानेवारीला कारागृहातून सुटका होण्याची शक्यता आहे. शशिकला यांच्या सुटकेला सुमारे आठवड्याचा कालावधी राहिलेला असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असून, कारागृहातच डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी शशिकला यांना चार वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्या 15 फेब्रुवारी 2017 रोजी तुरुंग अधिकाऱ्यांसमोर शरण आल्या होत्या. त्या कर्नाटकातील पराप्पना अग्रहार कारागृहात आहेत. शशिकला यांची शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 27 जानेवारीला सुटका होईल, अशी शक्यता आहे. त्याआधीच त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. याचबरोबर राज्यातील राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे.
शशिकलांच्या सुटका होण्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरणात अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेषत: अण्णाद्रमुक पक्षात मोठी उलथापालथ होण्याची चिन्हे आहेत. यामुळे मुख्यमंत्री पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम धास्तावले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या गटांनी एकत्र येऊन शशिकलांच्या विरोधात रणनीती आखण्यास सुरवात केली आहे.
शशिकलांच्या सुटकेमुळे राज्यात बदलणाऱ्या राजकीय समीकरणांचा धसका मुख्यमंत्री एडापड्डी के. पलानीस्वामी आणि उपमुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम यांनी घेतला आहे. यासाठी मुख्यमंत्री पलानीस्वामी व पनीरसेल्वम हे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी दिल्लीत पोचले आहेत. त्यांनी दिल्लीतून शशिकलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोघे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. चेन्नई मेट्रोच्या नवीन मार्गिकेच्या उद्घाटनाचे निमंत्रण देण्याचे अधिकृत कारण यामागे सांगण्यात येत आहे. मात्र, खरे कारण या शशिकला आहेत. शशिकला या 27 जानेवारीला कारागृहातून सुटणार आहेत. त्यानंतर निर्माण होणाऱ्या राजकीय परिस्थितीविषयी मोदींशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत.
भाजप पुन्हा तमिळनाडूच्या राजकारणात सक्रिय भूमिका बजावण्याच्या तयारीत आहे. द्रमुकला नामोहरम करण्यासाठी भाजपकडून अण्णाद्रमुकला मदत केली जात आहे. अण्णाद्रमुकने पलानीस्वामी यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केले आहे. या प्रकरणी सुरवातीला आढेवेढे घेणाऱ्या भाजपने अखेर पलानीस्वामी यांच्या नावाला पसंती दिली आहे. आता मोदींसोबतच्या भेटीत पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम हे आघाडीला अंतिम स्वरुप देतील, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
जयललिता यांच्या निधनानंतर शशिकला यांची अण्णाद्रमुकच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याआधी पक्षातील सहकारी ओ. पनीरसेल्वम यांनी बंड केले होते. त्यानंतर शशिकला यांनी तुरुंगात जाण्याआधी के.पलानीस्वामी यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली होती. अखेर पलानीस्वामी मुख्यमंत्री बनले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर पलानीस्वामी यांनी शशिकला यांचे पुतणे टी.टी.व्ही. दिनकरन पक्षातून हाकलून पनीरसेल्वम यांना पुन्हा पक्षात घेतले होते. यानंतर दिनकरन यांनी अम्मा मक्कल मुनेत्र कळघम पक्षाची स्थापना केली होती. यामुळे शशिकलांच्या सुटकेनंतर राज्यात मोठी उलथापालथ होणार आहे.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.