करीमगंज : विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आसाममध्ये काल (ता.१) मतदान झाले. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम या भाजप उमेदवाराच्या गाडीतून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना याची खबर मिळताच त्यांनी ही गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या विरोधात या गाडीवर हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाथरकांडी विधानसभा मतदारसंघासाठी काल मतदान झाले. मतदान झाल्यानंतर ईव्हीएम एका गाडीतून नेली जात होती. याची माहिती मिळताच विरोधी पक्षांनी ही गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची गाडी बंद पडल्याने त्यांनी एका गाडीला लिफ्ट मागितल्याचे सांगितले. नंतर ही गाडी भाजप उमेदवाराची असल्याचे निदर्शनास आल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीला अडवणाऱ्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्याच आले आहेत. मतदान यंत्रे घेऊन जाणाऱ्या गाडीवर हल्ला केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या घटनेनंतर ईव्हीएमची आयोगाने तपासणी केली. यात ईव्हीएमशी काहीही छेडछाड झाली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष वारंवार भाजपला लक्ष्य करीत असतात. भाजपकडून ईव्हीएममध्ये फेरफार केले जात असल्याचा आरोप विरोधक नेहमी करीत आहेत. आता निवडणूक झाल्यानंतर भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम सापडल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत. यात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय विरोधक व्यक्त करीत आहेत.
आसाममध्ये काल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. राज्यातील १३ जिल्ह्यांतील एकूण ३९ मतदारसंघात काल (ता.१) मतदान झाले. यात ७४.७६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यात तिसऱ्या व अंतिम फेरीतील मतदान ४ एप्रिलला होणार असून, मतमोजणी व निकाल २ मे रोजी जाहीर होईल.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.