मुंबई : बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीसह तिचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणात तीन महिन्यानंतरही गोस्वामी हे केवळ संशयित असून, आरोपी नसल्याचे समोर आले आहे. उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीदरम्यान ही बाब समोर आली आहे.
बनावट टीआरपी प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी अडचणीत आले आहेत. या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या काही अधिकाऱ्यांना अटक झाली असून, चौकशीचा फेरा सुरू आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली होती. गोस्वामी हे रिपब्लिक टीव्हीचा टीआरपी वाढवण्यासाठी दासगुप्ता यांना लाखो रुपये देत असल्याची खळबळजनक बाब तपासात समोर आली होती.
या प्रकरणात गोस्वामींना कोणताही विशेष दर्जा देऊ नये आणि त्यांनी चौकशीला सामोरे जावे, अशी मागणी मुंबई पोलिसांनी केली. यावर गोस्वामींच्या वकिलांनी ते अद्याप या प्रकरणात आरोपी नसल्याची बाब मांडली. गोस्वामी हे आरोपपत्रात संशयित असून, त्यांना अटक होऊ शकते, असे मुंबई पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.
गोस्वामींचे वकील म्हणाले की, देशातील फौजदारी कायद्यानुसार पोलीस एखाद्या व्यक्तीला केवळ संशयित म्हणणे आणि त्याचा आरोपपत्रात आरोपी म्हणून उल्लेख न करणे या बाबी बसत नाहीत. पोलिसांनी अर्णब गोस्वामींसह रिपब्लिक टीव्हीच्या कर्मचाऱ्यांविरुद्ध चुकीच्या हेतूने कारवाई सुरू केली आहे.
यावर न्यायालय म्हणाले की, पोलीस या प्रकरणाचा तपास तीन महिन्यांपासून करीत आहेत. परंतु, अद्यापही गोस्वामींना या प्रकरणात पोलिसांनी आरोपी केलेले नाही. मात्र, कोण आरोपी आहे आणि कोण आरोपी नाही याबद्दल स्पष्टता नाही. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी हा तपास थांबवण्याची मागणी मंजूर करता येणार नाही. तसेच, गोस्वामींच्या विरोधात पुरेसे पुरावेही पोलिसांनी अद्याप सादर केलेले नाहीत.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपी दासगुप्तांच्या जामिनावर उच्च न्यायालयासमोर नुकतीच सुनावणी झाली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील सूत्रधार कोण आणि यात दासगुप्तांची भूमिका काय, असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. यावर सरकारी वकिलांना आरोपपत्रात दासगुप्ता हेच सूत्रधार असल्याचे सांगितले होते. यावर या प्रकरणातील मास्टरमाईंड अर्णब गोस्वामी आहेत, असे दासगुप्तांच्या वकिलांनी उच्च न्यायालयाला सांगितले होते.
बनावट टीआरपी प्रकरणात पोलिसांनी 11 जानेवारीला पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. यात बीएआरसीच्या फॉरेन्सिक ऑडिटचाही समावेश होता. तसेच, गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट आणि 59 व्यक्तींचे जबाबही न्यायालयात सादर करण्यात आले आहेत.
Edited by Sanjay Jadhav
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.