घोषणांचा पाऊस...बारावी पास मुलींना 25 हजार तर पदवीधर मुलींना 50 हजार!

बिहारमधील विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राज्यातील वातावरण तापले आहे. आता मुख्यंत्री नितीशकुमार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडला आहे.
after poll announcement bihar chief minister nitish kumar makes major announcements
after poll announcement bihar chief minister nitish kumar makes major announcements

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या कहर वाढत असताना बिहारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज बिहारमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये मतदान होणार असून, 10 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीची घोषणा होताच आरोप-प्रत्यारोपांनीही जोर चढला आहे. आता मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडला आहे. राज्यातील विविध घटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी पावले उचलली आहेत. 

कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे बिहारमधील विधानसभा निवडणूक राजकीय पक्षांच्या व्हर्च्युअल प्रचारामुळे गाजणार आहे. बिहार विधानसभेची मुदत २९ नोव्हेंबरला संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले. या घोषणेसोबतच बिहारमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. एकूण तीन टप्प्यांत ही निवडणूक होत आहे. पहिला टप्पा २८ ऑक्टोबरला होणार असून, यात ७१ मतदारसंघ आहेत. दुसरा टप्पा  ३ नोव्हेंबरला असून, यात ९४ मतदारसंघ आहेत. तिसरा टप्पा ७ नोव्हेंबर असून, यात ७८ मतदारसंघ आहेत. निकाल १० नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत.  

यंदाच्या निवडणुकीत बिहारमध्ये वेगळे राजकीय चित्र पाहायला मिळणार आहे. मागील निवडणुकीवेळी सहकारी असलेले पक्ष आता विरोधात मैदानात आहेत. मागील वेळी लालूप्रसाद यादव यांचा आरजेडी, मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (जेडीयू) आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र होते. त्यावेळी भाजपने लोकजनशक्ती पक्ष, राष्ट्रीय लोकसमता पक्षासोबत आघाडी केली होती. मागील निवडणुकीच नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचा विजय झाला होता. या विजयानंतर काही महिन्यांमध्येच नितीश यांनी लालूंच्या पक्षाची साथ सोडत भाजपसोबत आघाडी केली होती. यामुळे विरोधी बाकांवरील भाजप आणि लोक जनशक्ती पक्ष सत्तेत आला होता. 

या निवडणुकीत आरजेडी हा काँग्रेसला सोबत घेऊन महाआघाडीचे नेतृत्व करत आहे. आधी या महाआघाडीचे घटक असलेले जितनराम मांझी आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) गेले आहेत. याचवेळी एनडीएमधील लोक जनशक्ती पक्षाने वाढीव जागा मिळाव्यात म्हणून आग्रह धरला आहे. 

मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याचे स्वागत केले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील बारावी पास मुलींना 25 हजार रुपये आणि पदवीधर मुलींना 50 हजार रुपये सरकार देईल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे देशभरातून स्थलांतरित बिहारी मजुरांचा लोंढा परतला आहे. त्यांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न सरकारसमोर आहे. या पार्श्वभूमीवर नितिशकुमार यांनी काही घोषणा केल्या आहेत. नितीशकुमार म्हणाले की, कौशल्य विकास आणि स्वयंउद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन मंत्रालय स्थापन करण्यात येईल, आयटीआय आणि पॉलीटेक्निक संस्था या अंतर्गत येतील. नवीन उद्योग स्थापन करणाऱ्या नागरिकांना सरकार मदत करेल. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com