न्यायाधीशांच्या हत्येनंतर सर्वोच्च न्यायालयही हादरलं; सरन्यायाधीशांनी उचललं हे पाऊल

जिल्हा न्यायाधीश मॉर्निंग वॉक करत असताना त्यांची हत्याकरण्यात आली होती. याची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे.
after dhanbad judge killing supreme court take suo moto cognizance
after dhanbad judge killing supreme court take suo moto cognizance

धनबाद : झारखंडमधील धनबादमध्ये जिल्हा न्यायाधीश मॉर्निंग वॉक करत असताना त्यांची हत्या (Judge Killing) करण्यात आली होती. याची सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्वत:हून दखल घेतली असून, राज्याच्या मुख्य सचिवांसह पोलीस महासंचालकांना आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. देशभरात असे प्रकार वाढले असून, सर्व राज्यांकडून या प्रकरणी अहवाल मागवले जातील, असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. 

देशभरात न्यायव्यवस्थेशी निगडित अधिकाऱ्यांवर हल्ले होत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा म्हणाले की, धनबादमधील प्रकरणाचे गंभीर परिणाम दिसून येतील. देशभरात अनेक ठिकाणी न्यायव्यवस्थेतील अधिकाऱ्यांवर हल्ले होत आहे. या प्रकरणांची तपासणी करण्यासाठी आम्ही सर्व राज्यांकडून अहवाल मागवू. 

झारखंडमधील धनबाद येथील ही घटना घडली होती. जिल्हा न्यायाधीश उत्तम आनंद यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना 28 जुलैला सकाळी घडली असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद करण्यास विलंब केल्याने सुरूवातीला या घटनेचे गांभीर्य समोर आलं नव्हतं. घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्यावर रिक्षाने न्यायाधीश आनंद यांना धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. 

न्यायाधीश आनंद हे पहाटे पाच वाजता मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. ते रस्त्याचे कडेने चालत होते. त्याचवेळी काही अंतरापर्यंत रस्त्याच्या मधून जाणारी रिक्षा न्यायाधीशांच्या जवळ आल्यानंतर अचानक त्यांच्या दिशेने वळते आणि थेट त्यांना धडक देऊन पुढे निघून जात असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. हत्येच्या उद्देशानेच रिक्षा धडकवण्यात आल्याचेही यामुळे स्पष्ट झाले होते. 

न्यायाधीश आनंद हे रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे एका व्यक्तीने पाहिले. त्यानेच त्यांना रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही तास त्यांची ओळखच पटली नाही. सकाळचे सात वाजले तरी ते घरी न परतल्याने कुटूंबियांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोधाशोध केल्यानंतर रुग्णालयात अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीची माहिती मिळाल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला होता. 

उत्तम आनंद यांच्या हत्येनंतर संपूर्ण न्यायव्यवस्थाच हादरून गेली आहे. सर्वोच्च न्यायालयातील बार असोसिएशनने हा मुद्दा सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्यासमोर उपस्थित केला आहे. सरन्यायाधीशांनी या प्रकरणी झारखंडच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा केल्याचे सांगितले. आता हे प्रकरण उच्च न्यायालयात आहे. याची आम्ही दखल घेतली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com