पद्मश्री परत करण्यास कंगना तयार पण एका अटीवर...

भारताला 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन कंगना राणावत वादात सापडली आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranaut Sarkarnama

मुंबई : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) आता वादात सापडली आहे. या प्रकरणी आता कंगनाने टीकाकारांना आव्हान दिले आहे.

कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून हे आव्हान दिले आहे. यात तिने 1947 मध्ये कोणते युद्ध झाले, असा सवालही केला आहे. तिने एका पुस्कातील काही उतारेही दिले आहेत. तिने म्हटले आहे की, सगळीकडे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे की, 1857 चा लढा हा स्वातंत्र्यलढा होता. याचबरोबर सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरजी यांच्या बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. मला 1875 माहिती आहे पण 1947 मध्ये कोणते युद्ध झाले. कुणी मला याबद्दल ज्ञान दिल्यास मी माझा पद्मश्री परत करेन. याचबरोबर सर्वांचा माफीबी मागेन.

कंगनाविरोधात देशद्रोहाची तक्रार

कंगनाविरोधात आधी मुंबई पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा कंगना मुंबई पोलिसांच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. तिच्या विरोधात आता आम आदमी पक्षाने (AAP) आघाडी उघडली आहे. आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रिती शर्मा मेनन यांनी याबाबत तक्रार केली आहे. कंगनाने देशद्रोही आणि भावना भडकावणारे वक्तव्य केले आहे. यामुळे तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यावर कार्यवाही करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Kangana Ranaut
माजी मुख्यमंत्र्यांना काँग्रेस सोडल्यानंतर दोनच महिन्यांत लागली राज्यसभेची लॉटरी

भाजपच्या खासदारानेही सुनावले

भाजपचे खासदार वरूण गांधी यांनीही कंगनाला सुनावले होते. त्यांनी कंगनाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या विचारांना वेडेपणा म्हणावा की देशद्रोह, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, कधी महात्मा गांधींच्या बलिदानाचा आणि तपश्चर्येचा अपमान तर कधी त्यांच्या मारेकऱ्याचा सन्मान आणि आता तर थेट हुतात्मा मंगल पांडेपासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान! या विचारांना मी वेडेपणा म्हणू की देशद्रोह?

Kangana Ranaut
चंद्रकांत पाटील म्हणतात, कंगनाचे भिकेचे वक्तव्य चुकीचे पण...

पद्म सन्मान काढून घेण्याची मागणी

विधान परिषदेच्या उपाध्यक्षा निलम गोऱ्हे यांनीही कंगनाला फटकारले आहे. त्यांनी म्हटले आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कंगना राणावतला नुकताच पद्म सन्मान दिला. त्याच्यानंतर कंगना राणावत हिने अत्यंत बेजबाबदर, निराधार आणि स्वातंत्र्ययोद्ध्यांचा अपमान करणारे विधान केले आहे. मी त्याचा निषेध करते. बेताल वक्तव्ये करणाऱ्या कंगनाने 1947च्या स्वातंत्र्य लढ्यात जीवन समर्पित करणाऱ्या योद्ध्यांनाच अपमानित केले आहे. तिने स्वातंत्र्यलढ्याचा अपमान केला आहे. त्यामुळे तिचा पद्म सन्मान ताबडतोब रद्द करावा आणि तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी विनंती मी राष्ट्रपतींना करणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com