माझ्यावर अत्याचार अन् असा छळ का सुरू आहे? कंगनाचा थेट सर्वोच्च न्यायालयालाच सवाल

अभिनेत्री कंगना राणावतसह तिच्या बहिणीवर देशद्रोहाचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी कंगनाने थेट सर्वोच्च न्यायालयाला सवाल केला आहे.
actor kangana ranaut qusetions supreme court about cases registered against her
actor kangana ranaut qusetions supreme court about cases registered against her

मुंबई : वादग्रस्त वक्तव्ये केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंडोली यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. यावर कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेऊनही उपयोग झाला नव्हता. आता कंगनाने या प्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयालाच सवाल केला आहे. 

कंगनाने मुंबईबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढवून घेतला होता. यामुळे कंगना आणि शिवसेना यांच्यात जोरदार सामना रंगला होता. यात कंगनाच्या बाजूने भाजप नेते मैदानात उतरले होते. तिने थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. तिने राज्यपालांसमोर गाऱ्हाणे मांडून, न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर कंगना मुंबई सोडून हिमाचल प्रदेशमधील तिच्या घरी परतली होती. तेथूनही तिने ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्यांची मालिका कायम ठेवली होती. 

कंगनाने दोन समाजात तेढ पसरवणारे वक्तव्य केल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध वांद्य्रातील महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावर न्यायालयाने कंगना आणि तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले होते. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार वांद्रे पोलिसांनी कंगना आणि रंगोली यांच्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. यात देशद्रोहाचा गुन्हाही त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. कंगना आणि रंगोली यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावली होती. मात्र, त्यांनी चौकशीसाठी हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. 

कंगना आणि रंगोलीने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर उच्च न्यायालयाने हा गुन्हा रद्द करण्यास नकार दिला. कंगना आणि रंगोलीने तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीसाठी हजेरी लावली नाही याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. भावाच्या लग्नाच्या तयारीत गुंतलो होतो, हे कारणही न्यायालयाने अमान्य केले होते. काहीही कारण असले तरी समन्स बजावल्यानंतर त्याचे पालन करायलाच हवे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. दोघींनी 8 जानेवारीला मुंबई पोलिसांसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचे कबूल केले होते. 

कंगनाने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने सर्वोच्च न्यायालयाला काही प्रश्न विचारले आहेत. तिने म्हटले आहे की, आपण सर्वजण मध्ययुगीन काळात का जगत आहोत? मी आधी ट्विटवर नसतानाही या प्रकरणात मला ओढले आहे. माझी बहीण रंगोलीने डॉक्टरांसाठी आवाज उठवला होता आणि त्यात मला अडकवण्यात आले. माझे घरही बेकायदा पद्धतीने पाडण्यात आले.  

तिने म्हटले आहे की, माझा मानसिक, भावनिक आणि शारीरिक छळ का केला जात आहे? माझ्याविरोधात गुन्हे दाखल करुन मला रोज त्रास दिला जात आहे. असा माझा छळ कशासाठी सुरू आहे? याची देशाला उत्तरे हवी आहेत. मी तुमच्यासाठी उभे राहिले होते आणि आता माझ्यासाठी उभे राहण्याची तुमची वेळ आहे. जय हिंद. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com