चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना रेड कार्पेट : नितीन गडकरी म्हणाले ही आपल्यासाठी सुवर्णसंधी

पाश्चिमात्य देशात चीनबद्दल रागाची भावना आहे. तसेच चीन जागतिक अर्थव्यवस्था नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारताला सहानुभूती मिळेल आणि त्याचा आपल्याला उद्योग वाढीसाठी प्रयत्न करून घेता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.
nitin gadkari
nitin gadkari

पुणे : ``कोरोनामुळे चीनमधून बाहेर पडणाऱया परदेशी कंपन्या भारतात याव्यात, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले असून त्या कंपन्यांना रेड कार्पेट घालण्यात येईल,`` अशी घोषणा लघू, व मध्यम उद्योग खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केली.

महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित वेबिनारमध्ये गडकरी बोलत होते. लघु आणि मध्यम उद्योगांचे सुमारे एक हजार प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. पुणे, मुंबई, नागपूर, मराठवाडा चेंबरचे अध्यक्षही त्यात सहभागी झाले होते.

लॉकडाउन नंतरची उद्योगांची वाटचाल, या विषयावर गडकरी म्हणाले, कोरोनाची माहिती चीनने दडविली, अशी पाश्चात्य देशांची धारणा आहे. जपानने आपल्या कंपन्यांना चीनमधून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. तशीच पावले युरोप, अमेरिकेतील देशांनी उचलली आहेत. त्यामुळे त्या कंपन्यांनी भारतात यावे, यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळेच या कंपन्यांसाठी रेडकार्पेट घालण्यात येईल. त्यांना हवे असलेले परवाने तीन महिन्यांत देण्यात येतील. महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांना ही सुवर्णसंधी आहे. तिचा फायदा पुण्या-मुंबईसह अनेक शहरांनी घेतला पाहिजे.

पाश्चिमात्य देशात चीनबद्दल रागाची भावना आहे. तसेच चीन जागतिक अर्थव्यवस्था नियंत्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे भारताला सहानुभूती मिळेल आणि त्याचा आपल्याला उद्योग वाढीसाठी प्रयत्न करून घेता येईल, असेही गडकरी यांनी सांगितले.

विदर्भ चेंबरचे अध्यक्ष सुरेश राठी यांनी या कंपन्यांची नावे किंवा तपशील मिळावा, अशी मागणी केली. त्यामुळे या कंपन्यांकडे विविध चेंबर्स पाठपुरावा करू शकतील, असे त्यांनी स्पष्ट केले. तर पुणे चेंबरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी, ज्या ठिकाणी कोरोनाचा उद्रेक नाही, तेथे तातडीने उद्योग सुरू करावेत. तसेच उद्योगांचे वर्किंग कॅपिटल वाढविण्यासाठी केंद्र सरकारने बॅंकांना गॅरंटी द्यावी, अशी मागणी केली. मुंबई चेंबरचे अध्यक्ष आशिष वैद यांनी, सुरू झालेल्या उद्योगांपर्यंत पोचण्यासाठी कामगारांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळावी. तसेच लॉकडाउन उठल्यावर आयातीचे प्रमाण वाढणार आहे. त्यावेळी देशातील उद्योगांचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष गिरीधर सनग्रेजा यांनी लघु आणि मध्यम उद्योगांना दिलेल्या कर्जाच्या व्याजदरात दोन टक्यांनी कपात करावी, अशी मागणी केली.

कौन्सिलचे अध्यक्ष रविंद्र बोराटकर यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. तर, मीनल मोहाडीकर यांनी आभार मानले.
--------------------------
नितीन गडकरी म्हणाले.....

- देशातील हायवेवरील मालवाहतूक 70 टक्क्यांपर्यंत सुरू झाली आहे
- मंबई- दिल्ली मार्गावर इंडस्ट्रियल क्लस्टर उभारण्याची प्रक्रिया सुरू
- मुंबई- दिल्ली रस्त्यावरून प्रवास 12 तासांत व्हावा, यासाठी प्रयत्न
- ऑटोमोबाईल, कृषी क्षेत्राला निर्यातीची संधी वाढली
- लहान, लघु आणि मध्यम उद्योगांच्या संकल्पनेत बदल करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान, वाणिज्य मंत्र्यांकडे सादर
- स्टेट बॅंक ऑफ इंडियाकडून लघु आणि मध्यम उद्योगांसाठी वर्किंग कॅपिटलमध्ये 20 टक्क्यांची वाढ अंडरटेकिंगद्वारे होणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com