नितीन गडकरी - राजकारणापलिकडे नाते जपणारा माणूस 

राजकारणात सत्ता असताना अनेकजण जवळ येतात. परंतु, सत्ता गेल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा दिसत नाहीत. परंतु नितीन गडकरी यांचे तसे नाही. मी सत्तेत असतानाही त्यांनी संबंध जोडले व मी सत्तेत नसतानाही त्यांनी ते संबंध कायम राखले. यात त्यांनी कधीही अंतर येऊ दिले नाही- दत्ता मेघे
नितीन गडकरी - राजकारणापलिकडे नाते जपणारा माणूस 

राजकारणात संबंध व नात्यांना काहीही अर्थ नसतो. परंतु, काही माणसे या संबंध व नात्यांना आयुष्यभर जपतात. राजकारणात वैचारिक मतभेद राहतात. माणसे या पक्षातून त्यापक्षात जातात. मात्र, यात माणसांशी असलेले ऋणानुबंध राखणारे फार थोडे नेते आज राजकारणात आहेत. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्थान खूप वरचे आहे.

माझे त्यांच्याशी गेल्या 25-30 वर्षांपासून संबंध आहेत. ते आमदार नव्हते. केवळ विद्यार्थी नेते होते, तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. एका विचारावर त्यांची ठाम निष्ठा आहे. या निष्ठेने ते भाजपाचा विस्तार करण्यासाठी सातत्याने झटत असल्याचे मी पाहत आलो आहे. या काळात अनेक अपयश त्यांनी पाहिले. यश मिळण्याची कोणतीही शक्‍यता नाही, असे दिवसही त्यांनी पाहिले. परंतु, त्या विचारावरील त्यांची निष्ठा कधी ढळली नाही. सत्तेसाठी त्यांनी कधीही तडजोडी केल्या नाहीत. भाजपचा गावोगावी विस्तार व लोकांसाठी काम करणे हेच त्यांचे मिशन राहिले आहे.

या काळात त्यांनी राजकारणापलिकडे जाऊन माणसे जोडली. कोणत्याही पक्षाची माणसे राहो त्यांनी तेथील लोकांशी व्यक्तीगत संबंध कायम राखले आहेत. सत्तेत असो वा सत्तेत नसो त्या व्यक्तीशी त्यांचे संबंध कायम ठेवतात. सामान्य कार्यकर्त्याशी बोलतात. सर्व जातीधर्माच्या लोकांशी त्यांनी आपले संबंध कायम केल्याने सर्व लोकांना ते आपले भले करतील, असा विश्‍वास आहे. ही त्यांची मोठी कमाई आहे. मी काँग्रेसमध्ये असल्यापासून माझे त्यांच्याशी संबंध आहेत. या काळात माझ्या जीवनात अनेक स्थित्यंतरे आली. काँग्रेसमधून शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलो. राष्ट्रवादी काँग्रेसमधून पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पार्टीत आलो. भाजपात येण्याचे मुख्य कारण नितीन गडकरी आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे व त्यांच्याशी असलेल्या संबंधामुळेच मी भाजपात आलो आहे, हे मला येथे नमूद केले पाहिजे. 

या प्रत्येकवेळी त्यांनी दिलेला शब्द पाळला आहे. राजकारणात दिलेला शब्द पाळणारे फार कमी लोक आहेत. एकदा शब्द द्यायचा व नंतर काहीतरी कारणे सांगून त्यापासून पळ काढणारे अधिक असतात. परंतु, गडकरी हा शब्दाला जागणारा माणूस आहे. भाजपात आलो तेव्हाच त्यांनी समीरला (मेघे) आमदार करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे यांना भाजपची उमेदवारी दिली. समीर मेघे यांना निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यापूर्वी सागर मेघे यांनाही त्यांनी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेत आमदार केले होते. या प्रत्येक वेळी गडकरी यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. हा काळ माझ्यासाठी अत्यंत धकाधकीचा राहिला आहे. अशावेळी नितीन गडकरी सारखे सहकारी मिळणे माझ्यासाठी नशिबाची गोष्ट आहे. 

राजकारणात सत्ता असताना अनेकजण जवळ येतात. परंतु, सत्ता गेल्यानंतर ते तुम्हाला पुन्हा दिसत नाहीत. परंतु नितीन गडकरी यांचे तसे नाही. मी सत्तेत असतानाही त्यांनी संबंध जोडले व मी सत्तेत नसतानाही त्यांनी ते संबंध कायम राखले. यात त्यांनी कधीही अंतर येऊ दिले नाही. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com