दानवेंच्या मतदारसंघात पत्नी आणि मुलगा लढवत आहेत प्रचाराचा किल्ला ...

दानवेंच्या मतदारसंघात पत्नी आणि मुलगा लढवत आहेत प्रचाराचा किल्ला ...

भोकरदन : घरातील एखादी व्यक्ती निवडणुकीला उभी राहिली की त्याचे अख्खे कुटुंबच प्रचारात सक्रीय होत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चारवेळा खासदार म्हणून निवडूण गेलेले रावसाहेब दानवेच उमेदवार असतील तर मग विचारायलाच नको. लोकसभा निवडणुक जसजशी जवळ आली तसे रावसाहेब दानवेंनी आपल्या विरोधकांना गार केल आणि निवडणुकीचा मार्ग सुकर करून घेतला. प्रदेशाध्यक्ष म्हणून संपूर्ण राज्याची जबादारी असल्यामुळे मतदारसंघात कमी वेळ देता येत असला तरी त्यांची ही उणीव त्यांच्या पत्नी निर्मला आणि चिरंजीव आमदार संतोष दानवे भरून काढत आहेत. एका अर्थाने रावसाहेब दानवेंच्या अनुपस्थितीत हे दोघेच किल्ला लढवतायेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. 

प्रचंड जनसंपर्क, साधी राहणी आणि लोकांमध्ये मिसळण्याची कला रावसाहेब दानवे यांना चांगलीच अवगत आहे. मग त्यांचे घोड्यावरून गावांत फेरफटका मारणे असो, की शेतात जमिनीवर बैठक मारून हातावर भाकरी घेऊन न्याहरी करणे असो या सगळ्या प्रकारांमुळे ते सामान्यांना आपलेसे वाटतात. 30-40 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांचे हे वागणे, बोलणे आणि त्यांचा मोकळा स्वभावच त्यांच्या यशाची गुरूकिल्ली समजली जाते. हेच गुण त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्येही उतरवले आहेत. 

दानवे यांच्या पत्नी, तिन्ही कन्या आणि मुलगा आमदार संतोष दानवे हे देखील आपल्या पित्याच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करतांना दिसतात. अनेक संकटांवर मात करत रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघात आपल्यासाठी पोषक वातावरण तयार करण्यात यश मिळवले आहे. पक्षाबरोबरच वैयक्तिक यंत्रणा देखील रावसाहेब दानवे नेहमीच कार्यरत ठेवत आले आहेत. तथी ती यावेळीही काम करतांना दिसते. 

महाराष्ट्रातील 48 पैकी 45 जागा निवडूण आणण्याचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवून महायुती प्रचाराला लागली आहे. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होत आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे यांना देखील या सभांना उपस्थित राहावे लागत आहे. अशावेळी नाही म्हटले तरी स्वतःच्या मतदारसंघातील प्रचारावर परिणाम होतोच. पण दानवे यांच्या पत्नी निर्मला, चिरंजीव संतोष दानवे यांनी ही जबाबदारी आपल्या खाद्यांवर घेतली आहे. मतदारसंघातील लग्नकार्य, प्रतिष्ठांनाची उद्घाटने असो की दारोदारी जाऊन प्रचार करणे असो यात हे दोघे मायलेक हिरारीने सहभागी होत आहेत. गुढीपाडव्याच्या निमित्ताने भोकरदन शहरात अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केली. प्रत्येकाची इच्छा की त्याचे उद्‌घाटन खासदार रावसाहेब दानवे यांनी करावे. पण ते शक्‍य नसल्याने अशा ठिकाणी संतोष दानवे व त्यांच्या मातोश्री निर्मला दानवे पोहचत आहेत. त्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या अनुपस्थितीत हे दोघेही त्यांचा किल्ला मजबूतीने लढवत असल्याची चर्चा मतदारसंघात होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com