नाशिक : ''शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ह्रदयात आहेत. त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याच्या सुचना आपल्या प्रत्येक सहकारी व मंत्र्यांना दिल्या आहेत. त्या दिशेने मी काम केले आहे. मी उत्तर महाराष्ट्राचा आहे. उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांनी साथ दिल्यास उत्तर महाराष्ट्र सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिसाला देऊ शकेल,'' असे राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी येथे सांगीतले.
नाशिक विभागीय कृषी आढावा बैठक येथे झाली. यावेळी त्यांनी कृषी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. यावेळी ते म्हणाले, ''विशिष्ट शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग काम करतो, असा आरोप होतो. यात सर्वसामान्य गरजू शेतकऱ्यांची संख्या कमी असते. हे चित्र बदलायला हवे. तळागाळातील शेतकऱ्यांना न्यायाची प्रतीक्षा आहे. त्यांना योजनांचा लाभ देऊन कामाच्या माध्यमातून कृषी विभागाचे प्रतिबंब दिसायला हवे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याविषयी अतिशय जागरुक आहेत. त्यांनी या दिशेने काम सुरु केले आहे.''
पुढे बोलताना श्री. भुसे म्हणाले, ''माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अपेक्षा व कर्मचाऱ्यांच्या कामात गती देण्यासाठी डिजिटलायझेशनवर भर देण्यात येईल. यावेळी त्यांनी राज्याचे कृषी सचिव ते कृषी सहाय्यक यांच्याशी थेट संवाद साधला. कृषी विभागाच्या प्रगतीचा आलेख उंचावत असला तरी दुसरीकडे आत्महत्या वाढत आहे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सामूहिक काम करून आत्महत्या रोखण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, फलोत्पादन संचालक श्री.जमधडे, प्रभारी विभागीय कृषी सहसंचालक संजीव पडवळ, विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.