विधानपरिषदेच्या बरखास्तीची पुन्हा मागणी

 विधानपरिषदेच्या बरखास्तीची पुन्हा मागणी

मुंबई ः विधानसभेतील कामकाज विधानपरिषदेत रोखून धरले जात असून ही परिषद बरखास्त करावी अशी मागणी भाजपाचे आमदार अनिल गोटे यांनी गुरुवारी दुसऱ्या दिवशीही लावून धरली. आम्ही केलेले कामकाज रोखून धरण्याचा कोणताही घटनात्मक अधिकार नसलेले लोक परिषदेत बसले आहेत. त्यामुळे हे लोक 12 कोटी जनतेची अपेक्षाभंग करत असून त्यांना अटकाव घातला पाहिजे अशी मागणीही गोटे यांनी केली.

परिषद बरखास्त करावी यासाठी यापूर्वी दोन वेळा मागणी केल्याचे दाखले देत बुधवारी आपण केलेली मागणी कामकाजातून काढून टाकल्याने माझा अधिकार नाकारला गेल्याचा आरोप करत गोटे यांनी, परिषद बरखास्त करण्याचे आपले म्हणणे रेकॉर्डवर आणले. 
25 जुलै 1961 रोजी रामभाऊ म्हाळगी यांनी विधानपरिषद बरखास्त करण्यासाठी केलेल्या भाषणातील काही ओळीही त्यांनी वाचून दाखवत त्यासाठीचे दाखले दिले. 
आम्ही लोकांमधून प्रत्यक्ष निवडून येतो, मात्र विधानपरिषदेतील सदस्य हे अप्रत्यक्ष निवडून येतात, मात्र हे सदस्य सरकारची गळचेपी करत असून त्यामुळे ही परिषद बरखास्त करावी अशी मागणीही गोटे यांनी केली.

दरम्यान तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी अनेकदा हा विषय सभागृहाचा नसल्याचे स्पष्ट केले मात्र गोटे यांनी आपले म्हणणे सुरूच ठेवले. विधानपरिषद एक ऐतिहासिक अपघात असल्याचे रामभाऊ म्हाळगी म्हणाले होते असे सांगत गोटे यांनी ही परिषद आपण केवळ पाश्‍चात्यांचे अंधानुकरण करत सुरू ठेवली आहे. त्यामागे कुणाचेही हित नाही असाही दावा त्यांनी केला 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com