मुंबईतील वस्त्याही झाल्या 'हाय रिस्क' 

मुंबईतील कोळीवाडे, चाळी आणि वस्त्याही आता 'हाय रिस्क एरिया' झाल्या आहेत. कोरोनाच्या भयाने त्या टप्प्याटप्प्याने सील केल्या जात आहेत. कोरोनाने श्रीमंत वसाहतींमधून आता झोपडपट्ट्यांमध्ये, वस्त्या-वस्त्यात हातपाय पसरलेत. कोरोनाच्या संकटाने देशाचे आर्थिक केंद्र असलेली मुंबई हादरलीय.
 मुंबईतील वस्त्याही झाल्या 'हाय रिस्क' 

कोरोना आता श्रीमंत वसाहतींपाठोपाठ गावठाणे, झोपडपट्ट्या, चाळींमध्येही पसरू लागलाय. कोरोनाचे रुग्ण आढळलेले विभाग, मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेने सील केले आहेत. हे विभाग हाय रिस्क विभाग म्हणून घोषित केले आहेत. 

सील केलेल्या विभागातील लोकांना जीवनावश्‍यक वस्तू मिळत नसल्याने लोकांचे हाल होत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील चाळी आणि झोपड्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

कोळीवाडे, गावठाणें, चाळी, झोपडपट्ट्यांही कोरोनाने सोडलेल्या नाहीत. त्यामुळे कोरोनाचं भय वाढत चाललंय. खबरदारीचा उपाय म्हणून ज्या विभागात कोरोना रुग्ण आढळले आहेत,

अशी गोरेगावातील बिंबीसार नगर, मलबारहिल, वाळकेश्वर, पोद्दार रोड, बेलासिस रोड, प्रभादेवी तसेच दक्षिण मुंबई आदी भागातील विभाग पालिका आणि पोलिसांनी सील केले आहेत. 

वरळी कोळीवाड्यात 10 रुग्ण आढळले असून येथील संख्याही वाढते आहे. प्रभादेवी येथील चाळीत 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आले आहे. चेंबूर आणि घाटकोपर येथेही रुग्ण सापडला आहे. दोन दिवसांपूर्वी बिंबीसार नगरामध्ये चार रुग्ण सापडले.

लंडनमधून भारतात परतलेल्या एका महिलेला कोरोना लागण झाल्याचे आढळले होते. त्यांच्या संपर्कातील निकटच्या तीन जणांनाही कोरोनाची लागण झाल्याने येथील परिसर सील केला. घाटकोपरमधील तब्बल ठिकाणे सील केली आहेत. 

मुंबई झोपडपट्ट्या आणि चाळी दाटीवाटीच्या आहेत. झोपडपट्ट्यांमध्ये 52 लाख नागरिक राहात आहेत. मुंबईत धारावी ही झोपडपट्टी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाते. या झोपडपतट्टीला मागे टाकतील अशा अनेक वस्त्या मुंबईत गेल्या काही वर्षांत उभ्या राहिल्या आहेत. त्यामध्ये वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव यंत्रणांपुढे चिंतेची बाब ठरला आहे. 

शहरातील हॉटेल, वसतीगृहे, धर्मशाळा, सभागृहे, मंगल कार्यालये, रिकाम्या इमारती, जीमखाना, महाविद्यालये, क्‍लब आदी ताब्यात घेऊन विलगिकरण कक्ष तयार केले जात आहेत. वस्त्यांमध्ये कोरोना वाढण्याची भीती असल्यानेच ही उपाययोजना करण्यात आली आहे. 

मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांनी सील केला आहे. त्यामुळे कोळीवाड्याचा अक्षरश: कोंडवाडा झाला आहे. तशीच स्थिती अनेक विभागात आणि वस्त्यांमध्ये दिसून येत आहे. संचारबंदी लागू असूनही लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. 

सील केलेल्या विभागातील लोकांच्या घरी असलेला जीवनावश्‍यक वस्तूंचा साठाही आता संपला आहे. त्यांना जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करणारी यंत्रणा उभारली नाही तर लोकांची उपासमार होण्याची शक्‍यता आहे. कोरोनाने सर्वाधिक फटका बसला आहे तो रोजंदारी करणाऱ्या मजुरांना आणि बेघर लोकांना. 

मुंबईतील अडीच लाख मजूरांचे आणि आरे कॉलनीच्या पाड्यामध्ये वास्तव्य करणाऱ्या आदिवासींचे हातावर पोट आहे. तर 70 हजार बेघर आहेत. त्यांची उपासमार सुरू आहे. ते मदतीची याचना करीत आहे.

हे संकट संपविण्यासाठी संचार बंदी सर्वांनी नियमांचे पालन करण्याची गरज आहे. जीवनावश्‍यक वस्तूंची साठेबाजी ना करता सर्व लोकांपर्यंत जीवनावश्‍यक वस्तू पोचविण्याची आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याची गरज आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com