भाजपच्या गळाला कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे आमदार लागणार का ?

 भाजपच्या गळाला कॉंग्रेस - राष्ट्रवादीचे आमदार लागणार का ?

 
मुंबई ता.27 : तुझे माझे जमेना, तुझ्यावाचून करमेना, अशी स्थिती शिवसेनेला सोबत घेऊन राज्यात सत्ता राबविणाऱ्या भाजप सरकारची झाली आहे. शिवसेनेच्या अलीकडच्या विरोधी कारवायांमुळे राज्य सरकार स्थिर करण्यासाठी इच्छुक कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या आमदारांना पक्षात घेण्याबाबत भाजप सकारात्मक असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात येते. विरोधकांना पक्षात घेण्याची ही राजकीय अफवा आहे की येणाऱ्या काळात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत येणार आहे, याबाबत राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. यासंदर्भात भाजप, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते पदाधिकाऱ्यांना काय वाटते हे जाणून घेण्याचा केलेला प्रयत्न. 
 सरकार स्थिर करण्याचा प्रयत्न : रावसाहेब दानवे 
सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपकडून सर्व शक्‍यता पडताळून पाहिल्या जात आहे. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथे भाजपला मिळालेले यश तसेच नुकत्याच झालेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप नंबर वन स्थितीत असल्याने अन्य पक्षातील लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी मोठ्या प्रमाणात भाजपत येण्यास उत्सुक आहेत. राज्यातील सरकार स्थिर असावे आणि पक्षाची ताकद वाढविण्यासाठी जे कोणी इच्छुक आहेत, त्याबाबतीत पक्षाच्या पातळीवर सामूहिक विचार करून निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. 
भीतीपोटी बातम्या पसरविल्या जात आहे: सुनील तटकरे 
यंदाचा अर्थसंकल्प मांडताना सत्ताधारी भाजपला संख्याबळ असतानाही भीती निर्माण झाली होती. या भीतीपोटी कॉंग्रेस राष्ट्रवादीचे आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, अशा बातम्या जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहेत. त्यात काहीही तथ्य नाही. आम्ही एकसंध आहोत, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले. 
शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न: धनंजय मुंडे 
राष्ट्रवादीचे आमदार भाजपत जाणार या राजकीय अफवा आहेत. फोडाफोडीचे वातावरण निर्माण करून सत्तेत असलेल्या शिवसेनेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. 
संभ्रम निर्माण करण्याचे काम : रत्नाकर महाजन 
उचलली जीभ लावली टाळ्याला अशी भाजपची रीत आहे. मध्यावधी निवडणुका झाल्या तर 200 आमदार निवडून येतील असे भाजपकडून सांगण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपच्या नेत्यांना हवा कशी निर्माण करायची याची कला अवगत आहे. जणू काही राजकारण आपल्यासाठी मोकळे आहे असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. 
पक्षांतर्गत बंदी कायदा असताना गोव्यामध्ये मनोहर पर्रीकर यांनी एक फॉर्म्युला पुढे आणला. विरोधी पक्षाच्या आमदाराला पक्षात आणून मंत्री करायचे आणि नंतर आमदार म्हणून निवडून आणायचे. हाच पर्रिकरांचा फॉर्म्युला महाराष्ट्रात वापरण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे का? इतर राजकीय पक्षांचे आमदार आणि नेते आपल्या संपर्कात आहे असे सांगून जनतेत संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपकडून केले जात असून कॉंग्रेसचा कोणीही आमदार भाजपच्या संपर्कात नाही, असे कॉंग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी स्पष्ट केले. 

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com