मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत होणारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक रद्द झाल्याची माहिती मिळते आहे. राज्यातले काँग्रेसचे मोठे नेते आता पुन्हा मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे राज्य राष्ट्रपदी राजवटीच्या दिशेने वाटचाल करते आहे, असे दिसून येते आहे.
दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार होती. पण आताच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक रद्द झाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे राज्यातले मोठे नेते मुंबईकडे रवाना झाले आहेत. दुसरीकडे विजय वडेट्टीवार, के.सी. पाडवी हे नेते आपल्या आमदारांची भेट घेण्यासाठी जयपूरला गेले आहेत.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंब्याचे पत्रे काल दिली नाहीत. त्यामुळे शिवसेनेची सत्ता स्थापनेची संधी हुकली. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेसाठी पाचारण केले आहे. आताची स्थिती लक्षात घेतला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आल्याशिवाय १४५ चा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे आता राष्ट्रवादीला सत्तेवर दावा सांगण्यासाठी केवळ काही तासांचा वेळ हाती असताना पुढे काय हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने चर्चेसाठी दोन दिवसांची वेळ मागितली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. आज काँग्रेसचे अहमद पटेल व मल्लिकार्जुन खर्गे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करण्यासाठी येणार होते. मात्र, शरद पवार यांनी फोन करुन अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे यांना दोन दिवसांनी येण्यास सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर केवळ चोवीस तासांत ५४ आमदारांची जमवाजमव अवघड असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे म्हणणे आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.