यवतमाळ : नागपूर येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार (ता.16) पासून होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील महत्त्वांच्या दहा प्रश्नांवर लक्ष केंद्रित केले आहे. ते आढावा घेणार असलेल्या 'टॉप टेन' प्रश्नांची यादीच मुख्यमंत्री कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला पाठविली आहे. जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे.
हिवाळी अधिवेशनात जिल्ह्याचा दरवर्षी आढावा घेण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. या बैठकीतून जिल्ह्याचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालण्याचा प्रघात आहे. मात्र, आजपर्यंत यावर विशेष असे काही ठोस निर्णय झाल्याचे ऐकिवात नाही. यंदा मात्र स्थिती वेगळी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाहिजे असलेल्या मुद्यांचीच माहिती मागविण्यात आली आहे. प्रश्नांचे प्राधान्यक्रम ठरवून देण्यात आले आहेत. कोणत्या विभागाची, तसेच कोणती माहिती हवी याचे स्वतंत्र प्रपत्र मुख्यमंत्री सचिवालयाचे उपसचिव कैलास बिलोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. वस्तुस्थितीदर्शक, परिपूर्ण व सुस्पष्ट माहिती मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या विषयाला विशेष प्राधान्य दिले आहे. ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर राज्यपालांनी मदत जाहीर केली. शेतकऱ्यांचे किती नुकसान झाले, त्यावर काय उपाययोजना करण्यात आल्या. सध्याची स्थिती काय, याची माहिती मुख्यमंत्री घेणार आहेत. जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी खड्डे जास्त रस्ता कमी अशी स्थिती आहे. यामुळे या मुद्यालाही मुख्यमंत्र्यांनी हात घातला आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झालेल्या खर्चाची माहिती मुख्यमंत्री घेणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषिपंप जोडणीची माहिती मागविण्यात आली आहे. 30 नोव्हेंबर 2019 पर्यंत प्रलंबित असलेल्या कृषिपंपांची स्थिती मागण्यात आली आहे. एक एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 या कालावधीत शेतकऱ्यांचे आलेले अर्ज, झालेली जोडणी आणि प्रलंबित असल्याचे कारण आदी माहिती मागविण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बैठक होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीत चांगले निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील जलसंधारण तसेच अपूर्ण जलसिंचन प्रकल्पाची माहिती मागितली आहे. सद्य:स्थितीत होत असलेले सिंचन, प्रकल्पातील जलसाठा यांची इंतभूत माहिती मागितली आहे. सोबतच ग्रामीण पेयजल योजनांचा आढावा ते घेणार आहेत. दरवर्षी जिल्ह्यातील अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झालेली असते. यावर खर्च करूनही योजना कार्यान्वित होत नसल्याच्या तक्रारी आहेत. खनिज विकास निधीतून निधी दिल्यानंतरही काम संथगतीने होत असल्याने या योजनांचा आढावाही घेण्याची शक्यता आहे.
या मुद्यांचा आढावा
-अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व उपाययोजना.
-जलसंधारण प्रगती.
-जि.प.अखत्यारितील रस्त्यांची स्थिती, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना
-अपूर्ण जलसिंचन, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन.
-कृषिपंप जोडणी-30 नोव्हेंबर 2019पर्यंतचे प्रलंबित अर्ज, 1 एप्रिल2018 ते 31 मार्च 2019 वीजजोडणी.
-प्रधानमंत्री घरकुल योजनेची तीन वर्षांची माहिती.
-स्वच्छ महाराष्ट्र अभियान.
-नानाजी देशमुख कृषी योजना.
-ग्रामीण पेयजल योजना.
-पोलिस गृहनिर्माण योजना.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.