बारामतीत घड्याळाचे बारा वाजवा आणि कमळ फुलवा : मुख्यमंत्री

बारामतीत घड्याळाचे बारा वाजवा आणि कमळ फुलवा : मुख्यमंत्री

बारामती शहर : घड्याळाला शॉक देऊन बारामतीत कमळ फुलवा आणि या बारामतीत घड्याळाचे बारा वाजवा असे आवाहन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन बारामतीत केले.

बारामती विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी आज मुख्यमंत्र्यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव येथे सभा घेत पवारांवर जोरदार टीकास्त्र सोडले.

बारामतीत आता यापुढील काळात दहशत चालणार नाही, लोकशाही बारामतीच्या दहशतीला आपली जागा दाखवून देईल असे सांगत बारामतीकरांनी परिवर्तन करून पवारांना घरी बसवावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले . आज राज्यामध्ये महायुतीची सत्ता येणार हे शेंबडं पोरगं देखील सांगेल असे सांगत पवार साहेबांच्या राष्ट्रवादीची अवस्था ही शोले मधले जेलर सारखी झाल्याचे त्यांनी सांगितले.

मी कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहे मला पैलवान दिसत नाहीत असे पवार साहेब सांगत असले तरी या वयात त्यांना एकट्यालाच राज्यात प्रचारासाठी फिराव लागत आहे ही बाब बरेच काही सांगून जाणारी आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता नॅनो पार्टी करण्याचे काम मतदारांनी करावे असे आवाहन करीत बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. राज्यात सरकार आल्यावर बारामतीला टँकरमुक्त केल्याशिवाय राहणार नाही , या परिसरात एकही टँकर दिसणार नाही प्रत्येक शिवारात पाणी आणून दिले जाईल असे सांगत या भागाचा विकास भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचे सरकार करेल अशी ग्वाही द्यायलाही मुख्यमंत्री विसरले नाहीत.

राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्यासंदर्भात बोलतानाही अंधेर नगरी चौपट राजा अशा थाटात आपलाच माणूस समजून या बँकेला घडविण्याचे काम अनेकांनी केले, ईडी ची नोटीस आल्यानंतर यावर त्याचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु कागदपत्रे ऑडिट रिपोर्ट यातून काय झालेले आहे हे सर्वांच्या समोर येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोपीचंद पडळकर यांनी बारामतीतून निवडणूक लढवावी ही माझी इच्छा होती, हा ढाण्या वाघ बारामतीत येऊन कमळ  फुलविल्याशिवाय परत जाणार नाही अशी माझी खात्री आहे, असे सांगत त्यांनी पडळकर यांचे कौतुक केले.

राज्यात पंधरा वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली तरी बारामतीत पन्नास वर्षे पवार कुटुंबीयांची सत्ता असतानादेखील तालुक्याच्या पश्चिमेकडील गावे आजही पाण्यासाठी धडपडत आहेत, त्यांना थेंबभर पाणी देऊ शकत नसाल तर याचा उपयोग नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात सर्वाधिक भाव देणाऱ्या माळेगाव कारखान्याइतक अजित पवारांच्या नेतृत्वाखालील कारखान्यांनी का दिला नाही, असा सवाल करत अजित पवारांवर देखील मुख्यमंत्र्यांनी टीकास्त्र सोडले.

याप्रसंगी गोपीचंद पडळकर यांनी ही बारामतीत कमळ फुलल्याशिवाय शांत बसणार नाही असे सांगत या निवडणुकीमध्ये बारामतीकरांनी परिवर्तन करून दाखवावे असे आवाहन केले.

याप्रसंगी दिलीप खैरे , अविनाश मोटे, चंद्रराव तावरे, बाळासाहेब गावडे, रंजन तावरे ,प्रशांत सातव, कुलभूषण कोकरे, वैष्णवी कोकरे , संदीप चोपडे, राजेंद्र काळे यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com