मुख्यमंत्र्यांची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा : दीड लाख पदे दोन वर्षांत भरणार

मुख्यमंत्र्यांची तरुणांसाठी महत्त्वाची घोषणा : दीड लाख पदे दोन वर्षांत भरणार

मुंबई : राज्याच्या सरकारी सेवेत आगामी दोन वर्षात तब्बल दीड लाख रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार विविध विभागांतील 72 हजार पदांची भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आर्थिक पाहणी अहवालात सरकारी सेवेत दोन लाख पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना विरोधी पक्षाच्या सदस्यांनी रिक्त पदां वरून सरकारची कोंडी केली होती. 
यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात केवळ बेरोजगारीवरच नव्हे तर, पायाभूत सुविधांच्या बाबतीतही क्रांतीकारी कार्य उभारत असल्याची माहिती दिली. 

राज्यात मागील पाच वर्षात 57,500 किमी लांबीचे रस्ते उभारले असल्याने हा एक विक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामधे 17,500 किमी लांबीच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आली असून यापैकी 10 किमीचे सिंमेट कॉक्रिटचे राष्ट्रीय महामार्गाचे जाळे तयार झाले असून हे सगळे रस्ते टोलमुक्त असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, 8293 कोटी रूपयाचे कर्ज उभारून तब्बल 30,000 किमी चे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे ग्रामीण रस्ते उभारल्याची त्यांनी माहिती दिली. देशात सर्वाधिक लांबीचे रस्ते उभारणारे महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य असल्याचे त्यांनी सांगितले. 

शिवस्मारकाला सर्व परवानग्या 

मुंबईजवळ उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी सर्व परवानग्या घेतल्या आहेत. स्मारकाच्या पूर्वतयारीवर 70 ते 80 कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला आहे. स्मारकाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असून राज्य सरकारच्यावतीने बाजू मांडण्यासाठी ऍटर्नी जनरलला विनंती करण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

इंदू मिलच्या जागेवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरू असून पुतळ्याची उंची 350 फुटावरून 450 फूट करण्यास मान्यता देण्यात आली आहे. डिसेंबर 2020 च्या महापरिनिर्वाणदिनी जनतेला स्मारकाचे दर्शन घेता येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

जलयुक्त शिवारचा दिलासा 

विरोधी पक्षनेत्यांनी या चर्चैत बोलताना जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावला. या योजनेमुळे पावसावरचे अवलंबित्व कमी होऊन संरक्षीत सिंचन व्यवस्था उभी करण्यात यश आल्याचे ते म्हणाले. पाणी साठवण्याची व्यवस्था म्हणून 1 लाख 61 हजार शेततळी निर्माण झाली आहेत. आता शेततळ्यांसाठी रोजगार हमी योजनेतून 45 हजार रूपये आणि राज्य सरकारकडून 50 हजार रूपये असे एकूण 95 हजार रूपये देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com