राज्यातील तीन हजार बेपत्ता महिला-मुलींचे झाले काय ? ः चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल 

  राज्यातील तीन हजार बेपत्ता महिला-मुलींचे झाले काय ? ः चित्रा वाघ यांचा सरकारला सवाल 

नगर : महाराष्ट्रात गेल्या सतरा महिन्यांत प्रशासकीय माहितीनुसार तीन हजार तीनशे महिला व मुली बेपत्ता आहेत. त्या कुठे गेल्या. त्यांचा तपास मात्र अद्यापही पोलिसांनी लावलेला नाही. सरकारही याबाबत अनभिज्ञ नाही, मात्र कार्यवाही होत नाही. यासाठी आता महिला राष्ट्रवादी कॉंग्रेस पुढाकार घेत आहे, त्याचाच भाग म्हणून महिला सेफ्टी ऑडिट अभियान सुरू केले असल्याचे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सांगितले. 

वाघ यांनी आज नगरमध्ये सकाळ कार्यालयाला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मंजुषा गुंड, पक्षाच्या महिला शहराध्यक्ष रेश्‍मा आठरे याची उपस्थिती होती. निवासी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. 

वाघ म्हणाल्या, राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्‍न अजूनही गांभिर्याने घेतला जात नाही. त्यामुळे कोपर्डीमधीलआरोपीला फाशी झाली तरी अत्याचार थांबत नाहीत. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आता पुढे येणे गरजेचे आहे. महिला सेफ्टी ऑडिट हा उपक्रम दोन महिन्यापासून मराठवाड्यात सुरु केला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून, राज्यभर हा उपक्रम सुरु केला जाणार आहे. 

पोलिस करतात तरी काय ? 
महिला तक्रार घेवून पोलिसांकडे गेल्यास तक्रारी घेत नाहीत. उलट तक्रार करण्यासाठी आलेल्यांना पोलिस उलटसुलट प्रश्‍न विचारतात. सर्वोच्च न्यायालयाने पिडीतेला कुठल्या प्रकारचे प्रश्‍न विचारायचे, कसे विचारायचे निर्देश दिलेले आहेत. मात्र पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. पोलिस यंत्रणाच महिला अत्याचाराबाबत अत्यंत असंवेदनशील आहे असा गभीर आरोप त्यांनी केल्या. 

तक्रारी वाढल्या असे सरकार सांगत असले तरी त्याचा निपटारा करण्याकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. मुळात महिला, मुलींवर होणारे अत्याचार थांबले पाहिजेत असे प्रत्येकांना वाटले पाहिजे आणि त्यासाठी राजकारणापलिकडे जाऊन या विषयाकडे पाहिले पाहिजे. ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसतर्फे "महिला सेफ्टी ऑडीट' उपक्रम घेतला आहे. मराठवाड्यातून त्याची सुरवात केलेली असून प्रत्येक तालुक्‍यातून चार गावे, महापालिका, नगरपालिकेतून चार प्रभाग निवडले आहेत, असे त्या म्हणाल्या. 

शरद पवार यांच्यामुळे महिलांना राजकारणात चांगली संधी मिळू लागली. आगामी निवडणूकीत चांगले काम करणाऱ्या महिलांना आगामी निवडणूकांत संधी मिळणार आहे. राज्याच्या अनेक भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला समाजासाठी चांगले काम करत असून त्यांना जनाधारही मोठा आहे, असे त्या म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com