मोहन जोशी हे बापटांच्या घरी चहा पिऊन प्रचाराला बाहेर पडत असतील... : चंद्रकांतदादा

मोहन जोशी हे बापटांच्या घरी चहा पिऊन प्रचाराला बाहेर पडत असतील... : चंद्रकांतदादा

बारामती शहर : सांगलीत वसंतदादांच्या नातवाला बॅट हाती घ्यावी लागते, पुण्यात गिऱीश बापटांचे परममित्र असलेले मोहन जोशी हे काॅंग्रेसचे उमेदवार आहेत. जोशी हे सकाळी बापटांकडे चहा पिऊनच प्रचाराला बाहेर पडत असतील, असे असेल तर काॅंग्रेस उरलीच कुठे, असा सवाल करत राष्ट्रवादीच भाजपचा प्रमुख विरोधक असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी `सरकारनामा`शी बोलताना नमूद केले. 

भाजप- शिवसेना युतीला राज्यात किमान 45 जागा मिळतील, यंदा बारामतीसह माढा व हातकणंगलेचीही जागा आम्ही खेचून आणू असा विश्वास भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी `सरकारनामा`शी बोलताना व्यक्त केला. 
चंद्रकांत पाटील यांनी आज पहाटे सहा वाजल्यापासूनच बारामती शहरात आपला दौरा सुरु केला. सातारावरुन पहाटे चार वाजता निघून पाटील सहाच्या सुमारास बारामतीत पोहोचले. शहरातील अशोकनगरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेमध्ये त्यांनी तासभर व्यतित केला, संघ कार्यकर्त्यांशी त्यांनी सुसंवाद साधला.

 त्यानंतर शहरातील काही कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा गाठी भेटी, शिवसेना पक्ष कार्यालयाचे उदघाटन व त्या पाठोपाठ सेना व भाजप कार्यकर्त्यांशी त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांच्याशी `सरकारनामा`ने मनमोकळी चर्चा केली.

बारामतीची जबाबदारी पक्षाने आपल्यावर दिलेली नाही, आपण ती मागून घेतलेली आहे, असा महत्वाचा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी या संवादादरम्यान केला. बारामतीत खरोखरीच परिवर्तन होऊ शकेल का...असे विचारता...शंभर टक्के...बारामतीतील परिवर्तनबाबत माझ्या मनात शंकाच नाही, असे लोकही कंटाळलेले आहेत, भाजपच्या मतदारांना या पूर्वी खात्री वाटत नव्हती, यंदा मात्र ही लढत खरी आहे, असे वाटत असल्याने मला हा विश्वास वाटतो, असे पाटील म्हणाले. 

48 जागा जिंकणे हा थोडा मोठा दावा असेल पण 45 पेक्षा खाली आम्ही येणार नाही, बारामती, माढा व हातकणंगले या जागा आम्ही या वेळेस जिंकलो तर कोणाला आश्चर्य वाटायला नको असे ते म्हणाले. 

सेना- भाजपचा मतदार हा युती होण्याचीच वाट पाहत असतो, नेत्यांचे मनोमीलन झाले आहे, त्यामुळे मतदार हा आमच्याच उमेदवारांना मतदान करेल, तो कधीच कॉंग्रेस व राष्ट्रवादीला मतदान करणार नाही या बद्दल माझ्या मनात शंका नाही. 
राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यावर टीकास्त्र सोडले, या बाबत बोलताना पाटील म्हणाले की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये त्याचे मत मांडण्याचा अधिकार असतो, आपल्याइतकी प्रगल्भ लोकशाही कोठेही नाही, मात्र याच राज ठाकरे यांना गुजरातचा विकास आवडला होता मात्र आता त्यांचे मतपरिवर्तन झाले आहे. मोदी आणि शहा राष्ट्रापुढील संकट आहे, हे ठाकरे यांचे मत आहे, सामान्य माणूस आज मोदी शहा यांच्याच सोबत उभा आहे, असे चंद्रकांतदादांनी सांगितले.

गांधी कुटुंबानंतर आता पवार कुटुंबाला भाजपने लक्ष्य केले, या बाबत विचारता ते म्हणाले, मूठभर ताकदीच्या आधारे त्यांनी राज्य चालविले, विरोधक म्हणून भाजपलाच त्याचा राग आहे अस नाही तर कॉंग्रेसलाही तो आहे. राज्यातील उरलेली कॉंग्रेसही या निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने संपविली आहे, राज्यातील कॉंग्रेस ही राष्ट्रवादीच चालविते अशी स्थिती सध्या आहे. कोणाला शिल्लकच ठेवायच नाही ही राष्ट्रवादीची परंपरा आहे, फेअर राजकारण करायचेच नाही असा त्यांचा इतिहासच आहे. अनफेअर राजकारण संपवायचे असेल तर राष्ट्रवादी संपविल्याशिवाय पर्याय नाही, त्या मुळे राष्ट्रवादीला विरोधक समजूनच आम्ही काम करतोय, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com