चंद्रकांतदादा नागपुरात आले मात्र काही बोलले नाहीत ?

चंद्रकांतदादा नागपुरात आले मात्र काही बोलले नाहीत ?

नागपूर: भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येथे आले होते. खासदार महोत्सवालाही त्यांनी हजेरी लावली. मात्र, पत्रकारांसोबत बोलण्यास त्यांनी नकार दिला. एरवी मीडियासाठी सहज उपलब्ध होणारे आणि सडेतोड वक्तव्य करणारे दादा का बोलले नाहीत? याचीच चर्चा दिवसभर राजकीय वर्तुळात होती. 

सध्या भाजपच्या संघटनात्मक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्याकरिता चंद्रकांतदादा पाटील नागपूरमध्ये आले होते. त्यांनी भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

रात्री खासदार महोत्सवालाही हजेरी लावली. पण बैठकीत नेमके काय झाले, हे कळू शकले नाही. भाजपच्या शहरातील इतर पदाधिकाऱ्यांनीसुद्धा बैठकीविषयी भाष्य करण्यास नकार दिला. 

राज्यात 105 आमदार असतानाही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. शिवसेना सोबत येईल आणि भाजपच परत येईल, अशी सर्वांनाच आशा होती. मात्र, घडले उलटेच. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

दुसरीकडे भाजपतील ओबीसी नेत्यांच्या कुरबुरी बाहेर येऊ लागल्या आहेत. गुरुवारी दिवसभर भाजपचे बारा आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्यात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्याही नावाचा समावेश होता. त्यामुळे वरिष्ठांवर भाजपचे नेते नाराज असल्याचे दिसून येते. 

अद्याप कोणीही पक्ष सोडला नसला, तरी भाजपत सर्वकाही आलबेल आहे, अशी स्थिती मात्र सध्या नाही. या प्रश्‍नांची उत्तरे टाळण्यासाठी पाटील बोलले नसावेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

विदर्भातील पराभव भाजपच्या जिव्हारी 
भाजपला सर्वाधिक फटका नागपूर जिल्हा आणि विदर्भात बसला आहे. जिल्ह्यात भाजपचे एकूण 11 आमदार होते. आता पाच शिल्लक राहिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात तसेच भंडारा, गोंदियातही भाजप झिरो झाली आहे.

विदर्भात सुमारे 15 आमदार भाजपने गमावले आहेत. हा पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. दुसरीकडे सत्ता स्थापन झाल्याने शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उत्साहित झाले आहेत. त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही यामुळे भाजपला फटका बसण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. 

काल विदर्भातील सर्व संघटन मंत्री नागपुरात आले होते. जिल्हानिहाय चर्चा झाली. प्रत्येक जिल्हाप्रमुखाशी चर्चा करून पराभवाची कारणे शोधून भविष्यातील नियोजन केले जात असल्याची माहिती आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com