अधिवेशनात वैजापूरचे आमदार बोरनारे यांनी उचलला रस्ते आणि सिंचनाचा महत्वाचा मुद्दा...

अधिवेशनात वैजापूरचे आमदार बोरनारे यांनी उचलला रस्ते आणि सिंचनाचा महत्वाचा मुद्दा...

औरंगाबाद : शिवसेना आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी पहिल्याच अधिवेशनात वैजापूर मतदारसंघातील रस्ते आणि रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचा मुद्दा उपस्थित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आमदार म्हणून निवडून आल्यावर पहिल्यांदाच सभागृहात मतदारसंघातील प्रश्‍न मांडण्याची मिळालेली संधी साधत बोरनारे यांनी महत्वाच्या मुद्यांना हात घातला. प्रा. रमेश बोरनारे हे वैजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. आमदार म्हणून त्यांचे पहिलेच अधिवेशन असूनही त्यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करत मतदारसंघातील महत्वाच्या दोन प्रश्‍नांबद्दल आवाज उठवला. महाआघाडी सरकारचे नागपूरमधील अधिवेशन सहाच दिवसांचे असल्यामुळे नवनिर्वाचित आमदारांना बोलण्याची किती संधी मिळेल ? याबद्दल शंकाच होती. 

पहिले तीन दिवस गोंधळता वाया गेल्यानंतर खऱ्या अर्थाने विधिमंडळाच्या कामकाजाला सुरूवात झाली. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्‍याने पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आलेल्या शिवसेनेचे आमदार प्रा. रमेश बोरनारे यांनी मतदारसंघातील 17 गावांतील रस्त्यांच्या दुर्दशेचा मुद्दा उपस्थित केला. 
बोरनारे म्हणाले, नागपूर-मुंबई या समृध्दी महामर्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आणि या मार्गाचे काम मुदतीआधी पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. त्याचे स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विकासात समृध्दी महामार्ग हा मैलाचा दगड ठरू शकतो.परंतु हा मार्ग करत असतांना वैजापूर तालुक्‍यातील 17 गांवामधून हा मार्ग जाणार आहे. सध्या समृध्दीचे काम सुरू असून त्यासाठी येणाऱ्या वाळू, खडी, सिमेंट, लोखंड आदीच्या ट्रक या मतदारसंघातील सतरा गावांच्या जिल्हा परिषद किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरून धावत आहेत. 

परिणामी या सतरा गावांतील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. मी जिल्हा परिषद सदस्य असल्याने माझ्यासह इतर सदस्यांनी रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून हे रस्ते केले होते. मात्र समृध्दीच्या कामासाठी धावणाऱ्या अवजड वाहनांमुळे या रस्त्यांशी अक्षरशा चाळण झाली आहे. जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्यांप्रमाणचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या मतदारंसघातील 120 कि.मी. भागातील रस्ते देखील यात बाधित झाले आहेत. माहितीच्या अधिकारात विचारलेल्या प्रश्‍नावर संबंधित विभागाने मला ही माहिती दिली. समृध्दी महामार्गाचे काम झालेच पाहिजे, पण त्या सोबतच ग्रामीण भागातील ज्या रस्त्यांची वाईट अवस्था या कामासाठी धावणाऱ्या ट्रक आणि अतिवापरामुळे झाली आहे, त्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी कोण देणार ? असा सवाल बोरनारे यांनी सभागृहात उपस्थित केला. नुकसान झालेल्या रस्त्यांच्या कामासाठी शासनाने अतिरिक्त निधी द्यावा अशी मागणी देखील बोरनारे यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे शासनाकडे केली. 

सिंचन योजनेला निधी द्या.. 
मतदारसंघातील रस्त्यांचा प्रश्‍न उपस्थित करतांनाच चाळीस गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वाची असलेली रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना पुर्णपणे कार्यन्वीत करण्यासाठी आवश्‍यक निधी द्यावा अशी मागणी देखील बोरनारे यांनी यावेळी केली. मागच्या सरकारने या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी 5 कोटी 80 लाखांचा निधी दिला होता. यातील 4 कोटी 79 लाख रुपये खर्च होऊन देखील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजना कार्यान्वीत होऊ शकलेली नाही. वीज बील भरून झालेल्या कामांची चाचणी घेण्यासाठी 42 लाखांच्या निधीची तातडीने गरज आहे. याशिवाय आणखी निधीची गरज असल्याने शासनाने याकडे तातडीन लक्ष द्यावे, जेणेकरून वैजापूर तालुक्‍यातील चाळीस गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटू शकेल असेही बोरनारे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com