पक्षांच्या गोटात : शिवसेना - जागावाटपात काय येणार काय गमावणार याची शिवसैनिकांना चिंता!

गेल्या काही वर्षांपासून युतीचा पुकारा करत भारतीय जनता पक्षामागे शिवसेनेची सुरू असलेली फरपट सामान्य शिवसैनिकाच्या जिव्हारी लागत आहे. भाजपची मेगाभरती, मोदी लाट, विधानसभेला स्वतंत्र लढणे आणि आता लोकसभेवेळी पुन्हा युती करणे, मध्येच सरकारविरोधात उठवलेले आवाज, अशा अनेक घटनांनी शिवसैनिक पुढे काय, असा प्रश्‍न विचारत आहे. या वेळी जागावाटपात काय वाट्याला येणार आणि काय गमावणार, याचं गणित त्याला सतावत आहे.
पक्षांच्या गोटात : शिवसेना - जागावाटपात काय येणार काय गमावणार याची शिवसैनिकांना चिंता!

शिवसैनिक हे खरं तर कधीही अस्वस्थ होत नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मनात रुजवलेला लढाऊ बाणा आज हरवल्यासारखा दिसत आहे. 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांनंतर भारतीय जनता पक्षाबरोबर 25 वर्षे कायम असलेली युती तुटली आणि हा शिवसैनिक संतापून उठला. त्याने उद्धव ठाकरे यांना 63 जागा जिंकून दिल्या. मात्र, तोच शिवसैनिक आज अस्वस्थ आहे; कारण त्यानंतर पक्षात काय चाललं आहे, तेच त्याला कळेनासं झालं आहे.

विधानसभेत मानाचं विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं असतानाही, उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत दबावाखाली सरकारात सामील होऊन आश्रिताचं जिणं स्वीकारलं, तेव्हापासूनच तो अस्वस्थ आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी तडफेने सरकारवर तोफा डागल्या आणि स्वतंत्रपणे लढण्याची भाषा केली, तेव्हा त्या शिवसैनिकाच्या मनात तो पूर्वीचा लढाऊ बाणा पुन्हा एकदा जागा झाला होता. मात्र, उद्धव यांनी सारे मानापमान निमूट गिळून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा युती केली, तरीही तोच अस्वस्थ शिवसैनिक तडफेनं लढला होता. मात्र, आता भाजपमध्ये सुरू असलेली "मेगाभरती' बघून तर तो कमालीचा अस्वस्थ झाला आहे, हे निश्‍चित. 

त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने विधानसभा युतीच लढवणार, अशी भाषा करत असले तरी या मेगाभरतीपुढे आता आपला पाड लागणार नाही, याची या शिवसैनिकाला जाणीव होऊ लागली आहे. भाजपमध्ये आतापावेतो दाखल झालेल्या कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या आमदारांपैकी किमान पाच जागा या युतीच्या जागावाटपातील शिवसेनेच्या आहेत. त्या अर्थातच भाजपला हव्या असणार.

शिवाय, ऑगस्ट महिन्यांत आणखी मेगाभरतीचे वायदे भाजप करत आहे. त्यामुळे युती झालीच तर आपल्या वाट्याला काय येणार, या चिंतेनं त्याला ग्रासलं आहे. केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दल मनात असलेल्या श्रद्धेपोटी आज तो ही मनातली खदखद मनातच ठेवून नेतृत्वाच्या मागे फरपटत जात आहे. 

ही भावना जशी गावोगावच्या शिवसैनिकांच्या मनात आहे, त्याचबरोबर 'मातोश्री'वर मुक्‍त प्रवेश असलेले चार-सहा नेते वगळता अन्य दुसऱ्या फळीच्या नेत्यांच्या मनातदेखील आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांच्या नावाने अगदी मोजकेच नेते करत असलेला मुख्यमंत्रिपदाचा गजर बघून तर हे नेतेही कमालीचे अचंबित झाले आहेत.

सरकारात सामील होण्याचा निर्णय झाल्यावरही थेट निवडून आलेल्या विधानसभेतील 63 आमदारांपैकी फक्‍त एकनाथ शिंदे या आमदारालाच मंत्रिपद मिळाले आहे. त्यामुळे हे नेतेही आला दिवस साजरा करत 'दिन भरो आंदोलना'त गुंतून पडले आहेत; तर अस्वस्थ शिवसैनिक आपल्या भवितव्याची चिंता करत आहेत. शिवसेनेच्या गोटात सध्या तरी हे असंच कमालीच्या अस्वस्थतेचं वातावरण आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com