आपल्या विजयाची सुरूवात नवी मुंबईपासून होईल - फडणवीस
पुणे - आपल्या विजयाची सुरूवात नवी मुंबईपासून होईल. औरंगाबाद महापालिकेवर सुद्धा भाजपचाच झेंडा फडकेल, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.
स्व. प्रा. रामभाऊ कापसे नगर, नेरूळ, नवी मुंबई येथे आयोजित भाजपा राज्य परिषदेच्या समारोप प्रसंगी फडणवीस बोलत होते.
ते म्हणाले, की आपल्याला धर्मासाठी लढायचे आहे. जे अधर्माच्या सोबत आहेत, ते जुने मित्र असेल तरी त्यांच्याविरोधात सुद्धा लढावे लागेल. सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही, ते तसेच पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. तुम्ही तिघे एकत्र आहात ना? जनता आजही कुणाच्या बाजूने आहे ते तुम्हाला कळून जाईल.
आज महिलांवर प्रचंड अन्याय होत असताना सरकार गप्प आहे. 22 तारखेला प्रत्येक तहसीलस्थानी सरकारला जाब विचारला जाईल. विरोधासाठी विरोध करणार नाही. पण जनतेच्या विरोधातील एकही निर्णय खपवून घेणार नाही. सरकारमध्ये बसलेले चिंतामुक्त झाले, पण आता शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
विश्वासघात तर झाला. पण आता रडण्याचे नाही तर लढण्याचे दिवस आहेत. आपण सारे शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. 22 किल्ले दिले, तर 44 किल्ले परत घेण्याची आपली ताकद आहे, असे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, की नागरिकता देणारा कायदा असताना जो गदारोळ उठविला जात आहे, तो साधा नाही. एक मोठे षडयंत्र त्यामागे आहे. सतेच्या तडफडीतून काही पक्ष देशात तणाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोठे मोठे नेते बुद्धिभेद करीत आहेत. आम्ही सारे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेले संविधान मानतो.दुसरे संविधान कुणीही तयार करू शकत नाही. ऐकून घेण्याचे दिवस संपले, आता सुनवण्याचे दिवस आहेत, असेही फडणवीस म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.